रायगडच्या जिल्हा आणि नियोजन बैठकीवरुन नवं नाराजी नाट्य आता महायुतीत बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगडची जिल्हा आणि नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या आमदारांना वगळण्यात आलं, असा आरोप शिसेनेच्या आमदारांनी केला आहे. आमदारांच्या आरोपांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी संताप व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. रायगड जिल्ह्यातील मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले या दोघांना बैठकीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर आदिती तटकरे बैठकीला उपस्थित होत्या. तर भरत गोगावले बैठकीसाठी अनुपस्थित होते. नाशिकच्या वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीसाठी दुपारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवळ यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्हाच्या डीपीडीसी बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेला रायगडच्या DPDC बैठकीतून वगळलं? शिंदे म्हणाले…
“आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. रायगडची जिल्हा आणि नियोजन संदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्यांचा वाद देखील लवकर मिटेल. ठिक आहे, काही आमदारांनी त्यांच्या काही भागातील सूचना असतील त्या द्याव्यात. त्याचाही आंतरभाव मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार आम्ही तीनही जण मिळून त्या आमदारांच्या सूचना, त्यांच्या भागाचे प्रश्न बजेटमध्ये घेऊ”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदेंची मुंबई आणि ठाण्यासाठी निधीची मागणी
“ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरची जिल्हा नियोजनाची बैठक होती. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. इथे जगभरातून लोकं येतात. म्हणून या मुंबई शहराची मी जिल्हा नियोजनाची बैठक घेतली तेव्हा अनेक आमदारांनी सूचना केल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे मुंबईतील रुग्णालये, उद्याने, मुंबईतील रस्ते, कोळीवाडे, किल्ले त्याचबरोबर नवीन प्रकल्प, हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा मिळायला पाहिजेत अशा सर्व विषयांवर जिल्हा नियोजन बैठकीत चर्चा झाली होती. आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमची सर्वांची चर्चा झाली”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“मी आवश्यक तो निधी मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यासाठी ठेवण्याची मागणी केलेली आहे. मला वाटतं, ठाणे जिल्हादेखील मोठा जिल्हा आहे. 18 आमदार, 3 ते 4 विधान परिषदेचे आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातही अनेक प्रकल्प आहेत. शैक्षणिक सुविधा, पर्यटन स्थळांचा विकास व्हायला पाहिजे, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर यावर जे पैसे आवश्यक आहेत त्याची मागणी केलेली आहे. मला वाटतं नक्की यामध्ये विकासासाठी कुठेही पैसे कमी करणार नाहीत”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
Rishiraj Sawant : बिझनेससाठी बँकॉकला गेला, घरी सांगितलं नाही, कारण… तानाजी सावंतांच्या मोठ्या मुलाने सगळं सांगितलं
‘जिथे आपत्ती तिथे एकनाथ शिंदे पोहोचतो’
“मला काही माहिती नाही, कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, कधी समिती झाली ते मला माहिती नाही. मला एवढं माहित आहे, जिथे आपत्ती येते, जिथे संकट येतं, जिथे महापूर येतो, तिथे एकनाथ शिंदे पोहोचतो”, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ शिंदे यांनी दिली.

