• Sat. Mar 7th, 2026

    आमदार विक्रम काळे यांनी मंत्रिपदाबाबत व्यक्त केली खदखद, म्हणाले, ‘ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली…’

    आमदार विक्रम काळे यांनी मंत्रिपदाबाबत व्यक्त केली खदखद, म्हणाले, ‘ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली…’

    राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी भर कार्यक्रमात भाषणात मंत्रिपदाबाबतची खंत व्यक्त केली. आपल्या मागून आलेले आमदार मंत्री झाले, पण आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, अशी खंत त्यांनी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका मांडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    लातूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाते आमदार विक्रम काळे यांनी मंत्रिपदाबाबत खदखद व्यक्त केली आहे. ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली ते समजलंही नाही. आमदार संजय बनसोडे हे माझ्या मागून मंत्री झाले. पण मी अजूनही आमदारच आहे, अशी खंत विक्रम काळे यांनी भर कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केली. विक्रम काळे यांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय बनसोडे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    दरम्यान, अनेक आमदारांना मंत्रिपदाची इच्छा असते. त्याप्रमाणे विक्रम काळे यांनादेखील मंत्रिपदाची इच्छा असल्याचं यातून दिसून येतं. पण आपल्याला मंत्रिपद लवकर मिळणार नाही, असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात नमूद केलं आहे. आमदार बाबासाहेब पाटील हे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना आधी मंत्रिपद मिळेल, मग आपला नंबर लागेल, असं विक्रम काळे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे याबाबत आपलं अजित पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याचं ते भाषणात सांगतात.

    विक्रम काळे नेमकं काय म्हणाले?

    “बाबासाहेब पाटील आणि मी सिनियर होतो. आम्हाला सोडून संजय बनसोडे कधी आमच्या दोघांच्या मधून गेले आणि मंत्री झाले ते कळालं नाही. आम्हाला आनंद झाला की, आमच्या भागातील एक तरुण कार्यकर्ता आमदार म्हणून विधानसभेत गेले आणि त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. आम्ही दोघांनीदेखील त्यांचं स्वागत केलं. आता कुणाचा नंबर लागणार? कारण मी जरी आमदारकीमध्ये सिनियर असलो तरी वयाने ज्येष्ठ बाबासाहेब पाटील आहेत”, असं विक्रम काळे म्हणाले.

    “बाबासाहेब पाटील तुम्हाला अध्यक्षांनी नागपूरला या म्हणून फोन केलेला ना? पाटील साहेब खरं सांगा, कारण पक्षप्रमुख अजित दादा पवार यांच्याशी माझी चर्चा झाले. ते म्हणाले की, ज्येष्ठांना प्राधान्य. मी म्हटलं, हरकत नाही. मला एकच कळतं की, काम करत राहणं. ज्या खुर्चीवर तुम्ही बसवलं आहे ती खुर्ची तुमच्या कामाला आली पाहिजे. माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कामाला यायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कामाला यायला पाहिजे”, असं विक्रम काळे आपल्या भाषणात म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed