• Thu. Mar 12th, 2026

    Jalgaon Train Accident: ठिणगी का उडाली? लोको पायलटला लोक दिसले नाहीत का? रेल्वे अधिकाऱ्यानं दिली महत्त्वाची माहिती

    Jalgaon Train Accident: ठिणगी का उडाली? लोको पायलटला लोक दिसले नाहीत का? रेल्वे अधिकाऱ्यानं दिली महत्त्वाची माहिती

    लखनऊवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि लोकांनी ट्रॅकवर उड्या टाकल्या. जळगावमधील झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जळगाव: जळगावमधील पाचोरा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाला. लखनऊवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि लोकांनी ट्रॅकवर उड्या टाकल्या. समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या लोकांना धडक दिली आणि अनेकांचा दुर्देवी अंत झाला. या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्याने या दुर्घटनेचे कारण सांगितले आहे.

    दुर्घटनेचे मुख्य कारण

    रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, अरुंद वळण असल्याने कर्नाटक एक्सप्रेसची दृश्यता प्रभावित झाली.रेल्वेच्या या ट्रॅक रुटच्या अंतर्गत असणाऱ्या सेक्शनवर रेल्वे १०० किमी प्रतितासहून जास्त वेगाने धावतात. दोन्ही रेल्वेकडून प्रोटोकॉलचे पालन झाले होते. त्यासोबतच दुर्घटना होऊ नये याचेही प्रयत्न केले गेले.पुष्पक एक्सप्रेसच्या लोको पायलटने नियमानुसार फ्लॅशर लाइट सुरू केली होती. कर्नाटक एक्सप्रेसच्या लोको पायलटने फ्लॅशर लाईट बघून ब्रेक लावला होता. मात्र ट्रक अरुंद वळणाचा असल्याने दृश्यता आणि ब्रेक लावण्याच्या अंतरावर परिणाम झाला.

    ठिणगी कशामुळे निर्माण झाली ?
    रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सागिंतले की, त्यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,एका जनरल डब्ब्यात एक ठिणगी उडाली आणि धूर पसरला, असे अनेकदा होते . एक्सल गरम अथवा ब्रेक जाम झाल्यास ठिणगी उडू शकते. मात्र त्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाश्यांनी अलार्म चेन खेचत रेल्वे थाबंवली आणि त्यांनी ट्रॅकवर उड्या टाकल्या. त्यावेळीच त्या ट्रॅकवर कर्नाटक एक्सप्रेस आली आणि दुर्घटना घडली.

    विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी माहिती दिली की, घटनास्थळावरुन १२ मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ६ ते ७ जण जखमी आहेत. कोणीही गंभीर जखमी नसून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    ५ लाखांची आर्थिक मदत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृत्यूमुखी लोकांप्रती श्रध्दांजली अर्पण केली आणि त्यांच्या परिवारासाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य सरकार जखमी प्रवाशांचा सर्व खर्च करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed