• Thu. Mar 12th, 2026
    शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान, पण आता विद्यार्थ्याला जमीन कसण्यासाठी द्यावी; कृषीमंत्र्यांच्या विधानाची एकच चर्चा!

    Agriculture Minister Manikrao Kokate Statement : कृषी विद्यापीठांमधून दिले जाणाऱ्या शिक्षणामध्ये पुस्तकी ज्ञानाचा जास्त समावेश असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शेतीकडे वळवायचे असेल तर कृषी विद्यापीठांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन एकर जमीन कसायला दिली पाहिजे, असे मत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केले.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : कृषी विद्यापीठांमधून दिले जाणाऱ्या शिक्षणामध्ये पुस्तकी ज्ञानाचा जास्त समावेश असल्याचे दिसून येत आहे, तर प्रात्यक्षिक ज्ञान कमी दिले जात आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालयामधून डिग्री घेतलेले युवक हे शेती न करता नोकरी आणि उद्योगधंद्यांच्या मागे फिरत आहेत. विद्यार्थ्यांना शेतीकडे वळवायचे असेल तर कृषी विद्यापीठांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन एकर जमीन कसायला दिली पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला शेतीचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळेल आणि तो शेती व्यवसायाकडे वळेल, असे मत माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले आहे.

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात आयोजित मुख्य कार्यक्रमात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. (डॉ.) इंद्रमणि, आमदार व कार्यकारी परिषद सदस्य डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, कृषि अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे आदी देखील उपस्थित होते.

    पुढे बोलताना कृषीमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने अनेक पिकांमध्ये संशोधन केले आहे, ही आनंदाची बाब असून कृषी उत्पादन वाढीत विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सोयाबीन, तूर पिकांमध्ये नवतंत्रज्ञानातून क्रांति घडविण्यात आली आहे. विद्यापीठ करीत असलेले संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणेही गरजेचे आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणात बदल करताना कृषि हा विषय त्यामध्ये नव्याने समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

    जलसंपदा मंत्र्यांनी मानले विद्यापीठाचे आभार

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट ही पदवी मी न्रमपणे स्विकारत असल्याचे सांगून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची गणना होते. हरितक्रांतिचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कृषी विद्यापीठाने ही पदवी दिल्यामुळे त्याचे वेगळेच महत्त्व असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी आभार मानले.

    सध्या जागतिक तापमानवाढ, बदलता आणि लहरी निसर्ग ही नवी आव्हाने शेतीपुढे आहेत. शेतक-यांचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठाने वाणांमध्ये नवनवीन संशोधन करून शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

    प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना राज्यपालांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्याबाबत विनंती करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमास उपस्थित श्री. विखे-पाटील यांना राज्यपाल यांच्या हस्ते डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed