Parli Sarpanch Died In Accident: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. बीडच्या परळीत ही घटना घडली आहे.
हायलाइट्स:
- राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची सरपंचाला धडक
- दुचाकीवरून जात असताना अपघात
- सौंदाना गावच्या सरपंचाचा अपघातात मृत्यू
बीडच्या परळीत मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावरुन जात असताना अभिमन्यू क्षीरसागर यांच्य दुचाकीला या टिप्परने धडक दिली. त्यामुळे संरपंच हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदना येथे त्यांच्या गावाकडे शेतातली कामे उरकून ते परळीच्या दिशेने जात होते. यादरम्यान, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या टिप्परने सरपंचाला उडवल्याने ते गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता यामध्ये दुचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीचा पूर्णपणे चंदामेंदा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. त्यानंतर बीडमध्येच पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

