• Mon. Mar 16th, 2026
    ३१ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली, आठ दिवसांनी मृतावस्थेत आढळली,रहस्यमयी मृत्यूचं कारण…..

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 9 Jan 2025, 9:34 am

    Crime News: ३१ डिसेंबर रोजी सकाळी घरातून कामासाठी निघालेली तरुणी रात्री घरी परतली नाही. तरूणीच्या कुटुंबियांनी या संदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आठ दिवस आई, वडिल आणि भाऊ या तरूणीचा शोध घेत होते. प्रत्येक सरकारी रुग्णालयात जाऊन तिची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर हे कुटुंब ठाणे सिव्हील रुग्णालयात पोहोचले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रदिप भणगे, कल्याण : थर्टी फर्स्टच्या सकाळी कामासाठी गेलेली कल्याणमधील तरूणी अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात केली. आठ दिवसांपासून कुटुंबिय या तरूणीचा शोध घेत होते. अखेर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या हाती लागला आहे. या तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढल्याने तपास यंत्रणा चक्रावली आहे.या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी एका तरूणासोबत मुलुंडला गेली होती. परत येत असताना दोघेही लोकलमधून वेगवेगळ्या ठिकाणी पडले. यातील तरूण जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र हे दोघे लोकलमधून कसे पडले ? तरूणीसोबत नक्की काय झाले ? याचा तपास लोहमार्ग पोलिस करणार आहेत.

    कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी तरूणी, पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात एका दुकानात कामाला आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी घरातून कामासाठी निघालेली तरुणी रात्री घरी परतली नाही. तरूणीच्या कुटुंबियांनी या संदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आठ दिवस आई, वडिल आणि भाऊ या तरूणीचा शोध घेत होते. प्रत्येक सरकारी रुग्णालयात जाऊन तिची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर हे कुटुंब ठाणे सिव्हील रुग्णालयात पोहोचले.

    मुलीचा मृतदेह रूग्णालयात असल्याचे आढळून आले. मुलीचा शोध घेत असताना सहा दिवसांपूर्वी, तरुणीच्या उत्तर प्रदेशातल्या एका गावातील सुमित विश्वकर्मा या तरुणाने फोन करुन सांगितले होते की, ती माझ्या सोबत होती. मात्र मी लोकलमधून पडल्याने ती कुठे गेली हे माहिती नाही. हे सांगितलेले खरे जरी असले तरी सुमित जिवंत आहे, तर तरुणी गेली कुठे ? असा सवाल उपस्थित झाला असतानाच अखेर तिचा मृतदेह सापडला आहे.

    या संदर्भात अतिरिक्त माहिती अशी की, सुमित विश्वकर्मा हा तरुणीचा मित्र आहे. तरुणी त्याला भेटण्यासाठी मुलुंडला गेली. तरुणीला सोडण्याकरीता ठाण्याहून ८ वाजून ४२ मिनिटांची लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने दोघे लोकलच्या दरवाज्यात उभे होते. तरुणीला घरी जाण्याची इच्छा नव्हती. याच दरम्यान कळवा खाडीजवळ तरुणीने धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न केला असता ती खाली पडली. नंतर काही अंतरावर तरुण सुमित खाली पडला आणि तो बेशुद्ध झाला.

    शुद्धीवर आल्यावर तो स्वत: चालत स्टेशनवर गेला. त्यानंतर कुटुंबियांना फोन करुन रुग्णालयात दाखल झाला. या अपघातात तो देखील जखमी झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. धावत्या लोकलमधून सुमित विश्वकर्मा कसा पडला ? या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे का ? धावत्या लोकलमध्ये तरुणीसोबत गैरप्रकार झाला आहे का ? की सुमितने काही केले आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहे. तरुणीच्या मृत्यूचे खरे कारण लोहमार्ग पोलिसांना शोधायचे आहे. मात्र घरच्यांनी तक्रार देऊनही या प्रकरणी कल्याणच्या बाजरपेठ पोलिसांनी काहीच कसे केले नाही ? या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed