• Thu. Mar 19th, 2026
    सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी शासनाच्या मदतीचा धनादेश धुडकावला, महायुतीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त

    Somanath Suryawanshi Family Rejects government Help: न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देऊ केलेली १० लाखांची मदत नाकारली आहे.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देऊ केलेली १० लाखांची मदत नाकारली आहे. धनादेश देण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक मृत सोमनाथ सुर्यवंशीच्या घरी पोहोचले असता त्याच्या कुटुंबीयांनी हा धनादेश नाकारला आहे. तर सुर्यवंशी कुटुंबियांनी महायुती सरकारच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

    शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधान प्रतिकृतीची एका माथेफिरूने विटंबना केल्याची घटना घडली. त्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने मुख्य बाजारपेठ भागात दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या, रास्तारोको केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले.

    पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांविरूद्ध कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. विधानसभा अधिवेशनादरम्यान हा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या निलबंनाची घोषणा केली.

    देशपातळीवरील नेत्यांपासून आंबेडकरी चळवळीतील देशभरातील लोकप्रतिनिधींनी सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील परभणीत येऊन सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन शासनाकडून भरीव आर्थिक मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

    यासोबतच काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर, भीम आर्मीचे खा.चंद्रशेखर आझाद यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. या मंडळींनी परभणीत येऊन सुर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी या मंडळींसह शासनाचे प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेल्या अनेकांनी सुर्यवंशी कुटुंबियांच्या म्हणणे ऐकून घेतले. सोमनाथच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी आणि कुटुंबास किमान ५० लाखांची मदत मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. त्यावर प्रतिसाद देत मदतीचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शासनाकडून याबाबत अजून कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याचे सुर्यवंशी कुटुंबियांचे म्हणणे आहे. दरम्यान, या कुटुंबियांनी अकोला येथे जाऊन अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेऊन आपली मागणी पूर्ण झाली नसल्याची तक्रार केली.

    प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाल झालेली नसल्याचे सोमनाथच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे. यातच बुधवारी दुपारी महसूलचे पथक थेट सुर्यवंशी राहत असलेल्या घरी पोहोचले आणि शासनाकडून मदतीपोटी १० लाखांचा धनादेश आणल्याचे सांगितले. मयत सोमनाथची आई विजयाबाई सुर्यवंशी यांच्या नावे तहसीलदार परभणी यांची स्वाक्षरी असलेला 7 जानेवारी 2025 या तारखेचा 10 लाखाचा धनादेश मंडळ अधिकार्‍यांनी सुर्यवंशी कुटुंबियांकडे दिला असता त्यांनी तो घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे पथकास आर्थिक मदतीचा धनादेश न देताच परतावे लागले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed