• Fri. Mar 6th, 2026
    …तोपर्यंत मुंडेंचा राजीनामा नाही! ‘त्या’ भेटीनंतर दादांचा निर्णय; दमानियांनी लाज काढली

    बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत आहे. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत आहे. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे बीडमधील राष्ट्रवादीच्याच दोन मंत्र्यांनी मुंडेंना बिनखात्याचं मंत्री करा, अशी मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडे यांना अभय देण्याचा निर्णय घेतला आहे.

    मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. कराडला झालेली अटक, त्यामुळे मुंडेंविरोधात तापलेलं प्रकरण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट घेतली. यानंतर अजित पवारांची भूमिका समोर आलेली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडेंविरोधात पुरावा सापडत नाही, तोपर्यंत राजीनामा घ्यायचा नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली असल्याची माहिती एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
    हत्येनंतर घुले भिवंडीत, हॉटेलात लपण्याची योजना; मालकामुळे प्लान फसला, थेट मेसेजच दाखवला
    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या न्यायालयीन, सीआयडी, एसआयटी चौकशी सुरु आहे. देशमुखांची हत्या एका खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय कराड आरोपी आहे. त्याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंडे मंत्रिमंडळात असल्यानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असं विरोधकांचं म्हणणं आहे. सत्ताधारी आमदारही मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत.

    या प्रकरणातील अजित पवार यांची भूमिका मात्र वेगळी आहे. मुंडे यांच्या विरोधात सध्याच्या घडीला कोणतेही पुरावे नाहीत. या प्रकरणात तीन-तीन चौकशा सुरु आहेत. त्यात जर मुंडे दोषी आढळले, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे. मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांच्याशी सव्वा तास संवाद साधल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची भूमिका समोर आलेली आहे.
    भाजप पदाधिकाऱ्याला पुणे विमानतळावर अटक; तपासणीवेळी संशय, बॅग उघडताच खळबळ
    अजित पवारांच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कडाडून टीका केलेली आहे. ‘सिंचन घोटाळ्यात संशयाची सुई अजित पवारांकडे होती. तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. अगदी तडकाफडकी ते पायउतार झालेले होते. आता मुंडेंच्या विरोधात अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत. कराड आणि त्यांच्या कंपन्या, जमिनी आहेत. त्यांचे अनेक व्यवहार झालेले आहेत. पण तरीही त्यांना जनाची सोडा, पण मनाचीही वाटत नसेल तर परिस्थिती बिकट आहे. आता जनतेनं मुंडेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडायला हवं. जनतेनंच लढायला हवं,’ असं दमानिया म्हणाल्या.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed