• Sat. Mar 7th, 2026
    चढ्या पाऱ्यासह नववर्षाचे आगमन; राज्यात किमान तापमानात वाढ, कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज

    Mumbai Weather News: सरासरीपेक्षा हे तापमान अनुक्रमे ३.२ आणि २.३ अंशांनी अधिक होते. रत्नागिरी येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी अधिक नोंदवले गेले. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस होते.

    हायलाइट्स:

    • चढ्या पाऱ्यासह नववर्षाचे आगमन
    • राज्यात किमान तापमानात वाढ
    • कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज
    महाराष्ट्र टाइम्स
    मुंबई हवामान बातम्या

    म.टा.विशेष.प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी तापमानाचा पारा सरासरीपेक्षा चढा असल्याने दुपारी उकाड्याची तीव्र जाणीव होऊ लागली. पश्चिमी प्रकोपाची प्रणाली अजूनही सक्रिय आहे. या प्रणालीचा महाराष्ट्रावर प्रभाव असल्याने सध्या वातावरणामध्ये बदल जाणवत असून आता कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतालाही कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, असा अंदाज आहे.पश्चिमी प्रकोपाचा परिणाम आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र तिचा परिणाम पूर्णपणे ओसरलेला नाही. या प्रणालीमुळे सध्या पूर्वेकडून वारे येत असल्याने मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा सांताक्रूझ येथे ३४.५ तर, कुलाबा येथे ३३ अंश सेल्सिअस नोंदला गेला. सांताक्रूझ येथे रविवारपेक्षा १ अंशांनी तर कुलाबा येथे रविवारपेक्षा २.८ अंशांनी हा पारा चढा होता, अशी नोंद झाली.
    Mumbai New Year: नववर्षाचे बंदोबस्तात स्वागत, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी १५ हजार पोलिस तैनात

    सरासरीपेक्षा हे तापमान अनुक्रमे ३.२ आणि २.३ अंशांनी अधिक होते. रत्नागिरी येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी अधिक नोंदवले गेले. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस होते. ही प्रणाली पूर्णपणे विरल्यानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागतील आणि त्यानंतर कमाल तापमानाचा पारा खाली येईल. मात्र तोपर्यंत कमाल तापमानामुळे उकाड्याशी सामना करायला लागण्याची शक्यता आहे.

    मुंबईमध्ये आज, मंगळवारी ३४ अंशांच्या आसपास तर, बुधवारी १ जानेवारीस ३५ अंशांच्या आसपास कमाल तापमान नोंदवले जाऊ शकते. २ ते ६ जानेवारी या कालावधीतही कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांदरम्यान असू शकतो.

    या काळात किमान तापमानामध्ये मात्र घट व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे पहाटेच्या वेळी तापमानाच्या त्रासातून थोडा दिलासा मिळू शकतो. किमान तापमानाचा पारा १ जानेवारीपासून घसरू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले. सध्या एकामागून एक प्रणाली निर्माण होत असून सकाळच्या वेळी थंड तर दुपारच्या वेळी उकाड्याची जाणीव होईल, असे कांबळे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed