• Sun. Mar 8th, 2026
    ‘…म्हणून ते विधानभवनात पर्यटकासारखे आले,’ हिवाळी अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका

    Eknath Shinde Slams Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावली होती. यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. अधिवेशनाच आजचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी अधिवेशनाच्या सहा दिवसांत भरगच्च काम झाल्याचे अधोरेखित केले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे म्हणाले ‘विरोधकांनी केवळ पायऱ्यांवरच प्रश्न मांडले आहेत.’ तर उद्धव ठाकरेंनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावली होती. यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. तर आमचं सरकार नव्यानं स्थापन झालं नाही तर आमची टीम तीच आहे आणि आता मॅच नवी असल्याचे देखील एकनाथ शिंदेंनी सांगितले.

    एकनाथ शिंदे म्हणाले, गेले आठ दिवस सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आम्ही चांगले निर्णय घेतले. खरं तर आमचं सरकार नव्याने स्थापन झालं नाही तर आमची टीम तीच आहे आणि आता फक्त मॅच नवी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचं कामकाज सुरु झालं आहे. अधिवेशनाचा वेळ कमी असला तरी सर्व कामकाज पूर्ण झालं. अधिवेशनात पुरवणी मागण्या देखील मान्य झाल्या आहेत. तर योजनांसाठी मोठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. तसेच आमच्या सरकारच्या सर्व योजना सुरु राहतील असेही शिंदेंनी नमूद केले.

    दरम्यान एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘काही लोक म्हणाले, आमचे मंत्री अधिवेशनात प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. तर काहीजण आले आणि अधिवेशन विनोदी असल्याची टीका करून गेले. मात्र, काहींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. पण आता ते आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून विधानभवनात येऊन गेले.’ असा खोचक टोला शिंदेंनी लगावला. तर शिंदेंनी पुढे विरोधकांनाही फटकारले आहे. ‘विरोधकांनी सभागृहात प्रश्न न मांडता फक्त माध्यमांसमोर आणि सभागृहाच्या पायऱ्यांवर मांडले. नव्या सरकारला आम्ही गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुती सरकारची जी गती होती, ती आता अधिक वेगवान झाली आहे’ असेही शिंदे म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed