• Fri. Mar 13th, 2026
    भाजपच्या वाट्याला पॉवरफुल खाती; चुरशीच्या स्पर्धेत कोणाची बाजी? अनेक दिग्गजांना दुय्यम विभाग

    फडणवीस सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आठवडा उलटल्यावर अखेर महायुती सरकारनं खातेवाटपाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा गृह खातं स्वत:कडे ठेवलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: फडणवीस सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आठवडा उलटल्यावर अखेर महायुती सरकारनं खातेवाटपाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा गृह खातं स्वत:कडे ठेवलं आहे. या खात्यासाठी आग्रही असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकाससह गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्रालय याआधी भाजपकडे होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ मंत्रालय कायम राखलं आहे.

    महायुती सरकार २.० मध्ये गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे राहणार हे निश्चित होतं. त्यामुळे या खात्यांबद्दल फारशी उत्सुकता नव्हती. महसूल, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण या पाच प्रमुख खात्यांसाठी भाजपमध्ये खूप मोठी रस्सीखेच होती. विशेष म्हणजे या ५ खात्यांसाठी भाजपमधून ७ जण स्पर्धेत होते. पण यातील गृहनिर्माण खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलं आहे. त्यामुळे भाजपकडे असलेलं शक्तिशाली खातं शिंदेंनी खेचल्याची चर्चा आहे.
    अखेर खातेवाटप जाहीर; फडणवीस, दादांकडे पॉवरफुल खाती; शिंदेंनी शक्तिशाली मंत्रालय खेचलं
    महसूल, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण खात्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांच्यात स्पर्धा होती. या ७ जणांपैकी बावनकुळे, महाजन, विखे-पाटलांनी यांनी बाजी मारली आहे. पाच वर्षांनंतर सरकारमध्ये एन्ट्री मारणाऱ्या बावनकुळेंना महसूल खातं मिळालं आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खात्याची (विदर्भ, तापी, कोकण विकास) सूत्रं देण्यात आली आहेत. ऊर्जा मंत्रालय फडणवीसांनी स्वत:कडे राखलं आहे. तर राधाकृष्ण विखे पाटलांना जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास मंडळ) विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
    Eknath Shinde: गृहखातं सोडलं पण… शिंदेंनी भाजपकडून दोन पॉवरफुल्ल खाती खेचली, सरकारमध्ये वजन वाढलं
    पाच प्रमुख खात्यांसाठी स्पर्धेत नसलेल्या जयकुमार गोरेंनी बाजी मारली आहे. त्यांना ग्रामविकास मंत्रालय मिळालं आहे. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, अतुल सावे यांच्याकडे तुलनेनं कमी महत्त्वाची खाती सोपवण्यात आलेली आहेत. पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण, शेलारांकडे माहिती तंत्रज्ञान, पंकजा मुंडेंकडे पर्यावरण, अतुल सावेंकडे ओबीसी विकास खातं देण्यात आलं आहे.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed