• Mon. Mar 16th, 2026
    शिंदेंच्या केबिनकडे ढुंकूनही पाहिलं नाही, ठाकरे फडणवीसांना भेटले, ‘ते’ दोघे गुपचूप बाहेर पडले

    Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत एकमेकांची भेट घेतली.

    महाराष्ट्र टाइम्स

    संजय व्हनमाने, नागपूर : राजकारणातील सारीपाटावरच्या सोंगट्या जशा बदलतात, तसेच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या भूमिकाही बदलत राहतात, हे अनेकदा पाहायला मिळते. जवळपास तसेच काहीसे मंगळवारी नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. गेल्या अडीच वर्षांत ज्यांनी एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत, सातत्याने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत एकमेकांची भेट घेतली.

    अर्थात ही भेट राजकीय संस्कृतीचा एक भाग असला, तरी यामुळे या दोघांमध्ये हातमिळवणी होणार नसल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. काही झालेच तर ते म्हणजे यातून शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होईल, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

    नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून, ठाकरे मंगळवारी अधिवेशनाला उपस्थित होते. अधिवेशनात आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ठाकरे त्यांच्या दालनात पोहोचले. मात्र, यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

    भेटीत काय घडलं?

    या भेटीत ठाकरे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन करून त्यांना पुष्यगुच्छही दिला. या वेळी आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत होते. भेटीदरम्यान बंद दरवाजाआड दोन्ही नेत्यांमध्ये ६ ते ७ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

    नार्वेकर यांच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय होते; पण उद्धव ठाकरे यांनी त्या दिशेला पाहिलेही नाही. ठाकरे विधानसभाध्यक्षांच्या दालनात असतानाच, तिथे शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई आणि आशिष जयस्वालही आले होते. मात्र, ते लगेचच दालनातून बाहेर पडले. फडणवीस यांच्या भेटीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
    Vidhan Parishad : मोदींचा आक्षेप, चित्रा वाघ-मनिषा कायंदेंची अडचण; चार वर्ष जुन्या प्रकरणात अचानक काय घडलं?

    ठाकरे गटाचं काय म्हणणं?

    ‘आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. हे ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएमवर संशय आहेच. राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी काम करावे, आम्हीही सूचना करू,’ असे आदित्य म्हणाले.

    ‘उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणजे दिलजमाई होणार आहे, हातात हात घालून बाहेर येणार असे होत नाही,’ असा टोला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed