• Tue. Mar 10th, 2026
    सत्ता स्थापनेचा पेच असताना शिंदे अचानक गावाला रवाना; महायुतीची बैठक रद्द; नेमकं चाललंय काय?

    Eknath Shinde: महायुतीला राज्यातील मतदारांनी सत्ता स्थापनेला कौल दिला. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तब्बल २३४ जागा जिंकल्या. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरु आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: महायुतीला राज्यातील मतदारांनी सत्ता स्थापनेला कौल दिला. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तब्बल २३४ जागा जिंकल्या. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली. या बैठकीत सत्ता स्थापनेबद्दल चर्चा झाली. यानंतर पुढील चर्चा मुंबईत केल्या जाणार असताना एकनाथ शिंदे त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे आजच्या प्रस्तावित बैठका रद्द झाल्या आहेत.

    एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावाला रवाना झाले आहेत. आज दुपारी त्यांनी ठाण्यातून साताऱ्यासाठी प्रयाण केलं. आज त्यांचा मुक्काम गावातच असेल. सत्ता स्थापनेसाठी मुंबईत बैठका आयोजित करण्यात आल्या असताना एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेला आणखी विलंब होणार आहे. शिंदे साताऱ्याला अचानक का गेले, यामागचं कारण अद्याप समूज शकलेलं नाही.
    गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
    विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या शनिवारी लागला. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी चर्चा, बैठका सुरु झाल्या. एकनाथ शिंदेंनी दोन दिवस मौन बाळगलं. या कालावधीत शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा शिंदे यांनाच मिळावं यासाठी जोरदार बॅटिंग केली. शिवसेना नेते मुख्यमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही होते. या दोन दिवसांत शिंदेंनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. या कालावधीत शांत राहून शिंदेंनी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवल्याचं बोललं जातं.

    दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेत निर्णयाचे सर्वाधिकार भाजप नेतृत्त्वाला दिले. माझ्याकडून कोणतीही आडकाठी होणार नाही. भाजपचा निर्णय माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी अंतिम असेल, असं म्हणत शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा जवळपास सोडून दिला. त्यानंतर काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह दिल्लीला रवाना झाले. त्यांची शहांशी जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शहांनी शिंदे, फडणवीस, पवार यांच्याशी एकत्रित बोलले. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृह विभागासह अनेक महत्त्वाची खाती मागितल्याची चर्चा आहे

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed