• Sat. Mar 14th, 2026

    पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 4, 2024
    पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – महासंवाद

    नांदेड दि. 3 सप्टेंबर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सुनेगाव शिवारामध्ये भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

    नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. रविवारी जिल्हयातील 93 मंडळापैकी 68 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे.

    दरम्यान महसूल यंत्रणा कामी लागली असून जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची नेमकी अंदाजित आकडेवारी उद्यापर्यंत पुढे येण्याची शक्यता आहे.

    आज पाहणी करताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सोबतच जिल्ह्यातील कृषी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पालकमंत्र्यांसोबत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार एक-दोन दिवसात उघाड मिळेल. त्यानंतर पंचनामे मात्र गतीने झाले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

    जिल्ह्यातील प्रकल्पांचा देखील त्यांनी आढावा घेतला. गोदावरील काठावर झालेले नुकसान तसेच शहरात झालेले नुकसान या संदर्भातील पंचनामे लवकरात लवकर करावे.शहरातील नुकसानासाठी तातडीची उपाययोजना शासनाने केली आहे. नगदी रक्कम देऊन ही मदत करण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed