• Sat. Sep 21st, 2024

७३ लाख मतदारांसाठी २० हजार बाटल्या शाई; मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारसंघांची स्थिती

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ व मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात ७३ लाख २८ हजार ८६५ मतदार आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोटाला शाई लावण्यासाठी तब्बल २० हजार २६७ बाटल्या मागवल्या जाणार आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी २४मध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य), मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) व मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांच्या बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचा साठा करण्याची तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने केली आहे.

मतदान प्रक्रियेत मतदारांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील (तर्जनी) बोटाला शाई लावली जाते. ती पुसली जाऊ नये म्हणून तिच्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या काही दिवसानंतरही ही शाई पुसली जात नाही. यामुळे एक मतदार एकदाच मतदान करू शकतो. शाई लावलेले बोट पाण्याच्या संपर्कात आल्यावर या शाईचा रंग काळा होतो. ही शाई ‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखली जाते. त्याच्याच २० हजारहून अधिक बाटल्या मागवल्या जाणार आहेत.

हैदराबाद आणि म्हैसूर येथे या शाईची निर्मिती केली जाते. चारही लोकसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची संख्या सात हजार ३५३ असून २७ सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत. शाईखेरीज पिंक पेपर सील (६१,३००), ग्रीन पेपर सील (३७,७६०), मॉक पोल स्लीप (९२७१), ॲरो क्रॉस मार्कर्स, मेटल सील (९२७१), कॉमन ॲड्रेस टॅगची (७२६३००) मागणी नोंदविण्यात आल्याचे उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने म्हटले आहे.

या निवडणुकीसाठी उपनगर जिल्ह्यात ५० हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत या कर्मचाऱ्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय कल्याण अधिकारी नियुक्त आहे. तसेच निवडणूक कालावधीत एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असतानाच या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही काळजी आता विशेषत्वाने घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. या कर्मचाऱ्यांना निवास, भोजन, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास तत्काळ कॅशलेस आरोग्य सुविधा संबंधित रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मीच जानकर, मीच खासदार असं समजून माझा प्रचार करा, महादेव जानकरांचं मतदारांना आवाहन

दरम्यान, मतदानाच्या दिवशी २० मे तारीख असल्याने ऊन चांगलेच तापलेले राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, बृहन्मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना सुसज्य राहण्याचे निर्देश राजेंद्र क्षीरसागर यांनी बुधवारी बैठकीत दिले.

मतदार अॅप

मतदानाच्या दिवशी काही मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादी भाग क्रमांकाची माहिती नसते. ही माहिती जिल्हा प्रशासन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देते. त्यानंतरही काही मतदारांना आपले नाव किंवा मतदान केंद्राची माहिती नसते. या पार्श्वभूमीवर voters.eci.gov.in आणि व्होटर हेल्पिंग अॅपवर मतदानापूर्वी आपले नाव तपासता येईल, असे निवडणूक कार्यालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed