सुनील साळवे यांनी रश्मी बर्वे यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे वापरून वापरल्याचा विरोधात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या तक्रारीवर कारवाई करत सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला या प्रकरणाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर गुरुवारी जात पडताळणी समितीने अनुसूचित जातीतील ‘चांभार’ जातीतील रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले.गुरुवारी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. यावेळी बर्वे यांनी दिलेले वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे. बर्वे यांनी या निर्णयाविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बर्वे यांचा अर्ज रद्द केला.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना रश्मी बर्वे म्हणाल्या, “मी अबला नाही, मी सबला आहे दुर्गेच्या अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपलं रूप घेते तेव्हा भस्मासुर सारख्या, महिषासुर सारख्या राक्षसाला निदस्त करते. हे तर सरकार आहे, यांचे दिवस जास्त नाही आहे. त्यांचे सरकार लवकरच जाईल. आज यांना विरोधक संपवायचा आहे. जो यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांच्यामागे अशा प्रकारचे कटकारस्थान हे सरकार करतं, या सरकारला लाज वाटायला पाहिजे की एका शेतकरी अनुसूचित समाजाच्या महिलेची जात प्रमाणपत्र अवैध आहे असा तासाभरात ठरवता, तुम्ही होता कोण? हे ठरवणारे ही सरकारची हुकूमशाही आहे. आणि ही हुकूमशाही फार काळ चालणार नाही. असेही रश्मी बर्वे यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
एकीकडे तपासादरम्यान रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला, तर दुसरीकडे बर्वे यांचे पती श्याम बर्वे यांचा अर्ज वैध ठरला. आता पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले श्याम बर्वे हे रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील.