”घटनेच्या तरतुदीनुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे स्थानिक आदिवासींची लोकसंख्या गृहीत धरुन या भागातील प्रश्न व समस्या लोकसभेत मांडून सोडविले जातील, हा उद्देश होता. अशी संकल्पना दृष्टीस ठेऊन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला होता. या संकल्पनेला छेद देवून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आपसी गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने स्थानिक नेतृत्वावर अन्याय झालेला आहे. माझ्या सारख्या पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करण्याऱ्या कार्यकर्त्याला कॉंग्रेसचे स्थानिक व राज्यपातळीवरील नेतृत्व गटबाजीने ग्रस्त असल्यामुळे न्याय देवू शकत नसेल, तर या क्षेत्रातील लोकांना न्याय कसा मिळेल? या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे”, असं ते म्हणाले.
उसेंडी यांनी २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा लढवल्या होत्या. परंतू ते अपयशी ठरले. नंतर कांग्रेसने दोन्ही विधानसभा निवडणुकीत डॉ.उसेंडींना डावलून मतदारसंघाच्या बाहेरच्या उमेदवारांना तिकिट दिले त्यामुळे पक्ष सातत्याने बाहेरच्यांना उमेदवारी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या राजीनाम्याने कांग्रेस पक्षावर काहीही फरक पडणार नसल्याचे त्यांनी उपरोधिकपणे सांगितले.
नामदेव उसेंडी पुढे म्हणाले की, ”कांग्रेस नेत्यांकडून नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु लबाडांच्या आश्वासनांवर आता माझा विश्वास राहिलेला नाही. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत मला आश्वासन देऊन मतदारसंघाबाहेरचे उमेदवार देऊन पक्ष संघटन कमजोर केले. आता जर खरोखरच माझी नाराजी दूर करायची असेल तर लोकसभेचा किंवा आगामी विधानसभेचा एबी फॉर्म माझ्याकडे द्यावा”. पत्रकार परिषदेला कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार उपस्थित होते. त्यांनी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना विश्वासात न घेणाऱ्या कांग्रेसचा आजच पराभव दिसत असल्याचे म्हटले आहे.
