• Sat. Sep 21st, 2024

राजकारण: दानवेंची डबल हॅट्ट्रिक रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार?

राजकारण: दानवेंची डबल हॅट्ट्रिक रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार?

विलास औताडे, जालना: दुष्काळ आणि पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र अशी ओळख झालेल्या जालन्यात गेल्या सलग सात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत आहे. भाजपने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अजून काँग्रेस लढणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जालन्याची जागा देणार यावर ठरलेले नाही. अन्य पक्षांकडून अजूनतरी काहीच निर्णय जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत दानवे डबल हॅटट्रिक करणार की, त्यांना विरोधक या वेळी रोखणार हे मोठे आव्हान विरोधकांसमोर असणार आहे. एकूणच यावेळची जालना लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आणीबाणीनंतर काँग्रेसला उतरती कळा लागली. शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्वतंत्र चूल मांडल्यानंतर अंकुशराव टोपे आणि त्यांचे पुत्र माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे शरद पवारांसोबत गेले. टोपेंनी मतदारसंघात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र लोकसभेसाठी राजेश टोपे यांचा घनसावंगी मतदारसंघ परभणी लोकसभेला जोडला गेला आहे.

काँग्रेसकडून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना दानवेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काळेंनी मतदारसंघात गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जालना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात दिसत आहे; परंतु माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत आहेत. त्यामुळे राजकीय गणितांची जुळवाजुळव केली जात आहे.

विधानसभानिहाय चित्र

जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे सहा मतदारसंघ येतात. जालना काँग्रेस, भोकरदन, बदनापूर हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघ भाजपकडे, सिल्लोड व पैठण शिवसेनेकडे आहेत.
राजकारण: काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा मिळविणार? प्रतिष्ठा पणाला, पाडवी की गावित, कोण बाजी मारणार?

गेल्या तीन निवडणुकांचे निकाल

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत मतदारांनी भाजपला साथ दिली आहे. २००९मध्ये भाजपचे रावसाहेब दानवे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा आठ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेसने विलास औताडे यांना उमेदवारी दिली. भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी विजय मिळविला. २०१९मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा विलास औताडे यांनाच उमेदवारी दिली. रावसाहेब दानवे यांनाच भाजपने उमेदवारी दिली.दानवे पुन्हा विजयी झाले. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना ७७ हजारांहून अधिक मते मिळाली होती. या निवडणुकीत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. त्यावेळी शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता.

यंदा रिंगणात कोण?

पक्षफुटी आणि बदलत्या राजकीय समीकरणाचा जालन्यात प्रभाव दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद दोन गटांमध्ये विभागली गेली; भाजप दानवेंच्या एकहाती नियंत्रणाखाली आहे. अर्जुन खोतकरांच्या नाराजीची कुजबूज आहे, मात्र ते श्रेष्ठींच्या शब्दाबाहेर जाणार नसल्याचे सांगण्यात येते. डॉ. संजय लाखे पाटील यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. रावसाहेब दानवेंची उमेदवारी जाहीर झाली, पण महाविकास आघाडी व अन्य पक्षांकडून कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही.

मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव जनमानसात आहे. मनोज पाटील जरांगे यांना आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. जिल्ह्यातूनही सर्वपक्षीय कार्यकर्ते जरांगे यांच्या सोबत आंदोलनात सहभागी झाले. जरांगे काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील निवडणुकीला यावेळी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेच्या मतदानावर या सगळ्या वातावरणाचा निश्चितच परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येते.

भाजपनं निवडून दिलं पण हेमंत गोडसे भाजपचं एक काम करत नाही, भाजप नेत्याचा आरोप

nandurbar lok sabha constituency

प्रचारातील प्रमुख मुद्दे

देशपातळीवरील मुद्द्यांबरोबरच जिल्ह्यातील राजकारण आणि स्थानिक मुद्दे चर्चेत येतील. रेल्वेच्या नवीन जालना ते जळगाव आणि जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वेमार्ग, पीटलाईन्स् याची चर्चा होईल, पक्षांतील फूट, निष्ठावंत, गद्दार हे मुद्देही येतील. मराठा आणि धनगर आरक्षणाचे आंदोलनांची राजकीय चर्चा होईल. दहा वर्षांपासून रखडलेल्या विकास योजना यात प्रामुख्याने ड्रायपोर्टचे अर्धवट काम झाले असतानाच निवडणुकीच्या तोंडावर झालेले उद्घाटन, बंद पडण्याच्या अवस्थेतील रसायन तंत्रज्ञान संस्था, सीडपार्क, नवीन औद्योगिक वसाहतीतीच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नांची तकलादू सोडवणूक, शेतीमालाचा भाव, नैसर्गिक अपत्ती आणि नुकसानभरपाई हे मुद्देही असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed