• Mon. Mar 16th, 2026
    जनता ठामपणे महाराजांसोबत, शाहू महाराज छत्रपतींसाठी संभाजीराजेंची भावनिक पोस्ट व्हायरल

    कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत होते. दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यानंतर कोल्हापुरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला होता.
    यंदाच्या निवडणुकीत उमेदवार सापडत नाही, आधीच्या खासदारांनी विकासासाठी काय केलं, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
    दरम्यान २५ वर्षानंतर कॉंग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यानंतर आता यावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांची भावना मांडली आहे. लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं?

    अभिनंदन बाबा…गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

    आरक्षणाचा फटका बसणार, प्रचार न करताही मराठा समाजातील उमेदवारालाच मत देणार | मराठा बांधव

    खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *