• Sat. Sep 21st, 2024

राजकारण: लातूरमध्ये कुणाचे पारडे जड? राखीव मतदारसंघात एकदा काँग्रेस तर दोनदा भाजपचा विजय, यंदा वारं कुणाचं?

राजकारण: लातूरमध्ये कुणाचे पारडे जड? राखीव मतदारसंघात एकदा काँग्रेस तर दोनदा भाजपचा विजय, यंदा वारं कुणाचं?

लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. यंदा भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे रिंगणात आहेत. अन्य पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर होतील. स्थानिक उमेदवारांमुळे निवडणुकीची चुरस वाढणार असे चित्र आहे.लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून हा मतदारसंघ राखीव झाला असून, एक वेळा काँग्रेसने, तर दोन वेळा भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. यंदा भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे रिंगणात आहेत. अन्य पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर होतील. तूर्तास तरी स्थानिक उमेदवारांमुळे निवडणुकीची चुरस वाढणार असे चित्र आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा व लोहा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी लातूर शहर व ग्रामीण काँग्रेस, लोहा अपक्ष, निलंगा भाजप, अहमदपूर व उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

महायुतीचे ‘पत्ते’ बघून शरद पवार उमेदवार ठरवणार, समोरुन ‘राजे’ आल्यास मविआचा ‘एक्का’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे या मतदारसंघावर २००४ पर्यंत वर्चस्व होते. सन २००४ मध्ये भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा ३०,८९१ मतांनी पराभव केला. त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना लातुरातून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विजयाची जबाबादारी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर होती. आवळे यांनी भाजपचे सुनील गायकवाड यांचा पराभव केला. अगदी कमी मताधिक्याने गायकवाड पराभूत झाले होते. सन २०१४ मध्ये डॉ. सुनील गायकवाड यांना भाजपने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांचा दोन लाख २३ हजार ३९५ मतांनी पराभव केला.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य, उद्योजक सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसनेही उद्योजक असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेले मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली. मोदी लाटेमुळे शृंगारे यांनी काँग्रेस उमेदवार कामत यांचा दोन लाख ८९,०११ मतांनी पराभव केला. निवडणुकीत भाजपला ५६.५४ टक्के मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांना एक लाख १२ हजार २५५ मते मिळाली होती.

लातुरात रेल्वे कोच फॅक्टरी उभी राहिली. प्रत्यक्षात लोकांना मिळणारा अपेक्षित रोजगार, पूरक उद्योग सुरू होण्याचे स्वप्न, त्यातून मिळणारा रोजगार हा या वेळच्या निवडणुकीचा कळीचा मुद्दा असणार आहे.

भाजपला देशात लोकशाही नकोच का? काँग्रेसची बँक खाती गोठवल्यानंतर लातूरकरांचा सवाल

केंद्रीय निधीतून २५० कोटी रुपये खर्चाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. मात्र, हे रुग्णालय सरकारने सुरू करायचे, की खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) सुरू करायचे या घोळात अडकून पडले आहे. लातूरला रेडिओचे एफएम केंद्र असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. लातूर रेल्वेस्थानकावरून तिरुपतीला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वेची फक्त घोषणाच झाली आहे. लातूर-पुणे इंटरसिटी सुरू झाली. मात्र, ती अवेळी आहे. भविष्यात प्रवाशांअभावी ती बंद झाली तर आश्‍चर्य वाटायला नको, हे मुद्दे या वेळच्या लोकसभा निवडणुकीत कळीचे असणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, शेतकरी आंदोलन, पाणीप्रश्न, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही अडचणीचे असतील, यात शंका नाही. काँग्रेसने स्थानिक उमेदवाराला संधी दिल्यामुळे यावेळची निवडणूक चुरशीची होणार, यात शंका नाही.

२०१९ च्या निवडणुकीत मिळालेली मते

सुधाकर शृंगारे – भाजप – ६,६१,४९५

मच्छिंद्र कामत – काँग्रेस – ३,७२,३८४

राम गिरकर – वंचित बहुजन आघाडी – १,१२,२५५

लातूर लोकसभा

एकूण मतदार – १९ लाख ६९ हजार १७७

पुरुष मतदार – दहा लाख २९ हजार ९६१

महिला मतदार – नऊ लाख ३५ हजार ७७५

इतर – ६३

नवमतदार (१८ ते १९) – ३३ हजार ६०९

एकूण मतदान केंद्र – दोन हजार १२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed