निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडली, मात्र अद्याप शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला नाही. काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रवेश रखडला असल्याची माहिती आहे. परंतु लोकसभा लढवण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. याच दरम्यान शरद पवार आणि लंकेंच्या चर्चा जोरावर असताना विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.
सुजय विखे यांचे ट्वीट
आज पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसांच्या कालावधीत विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे शक्य नव्हते. हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी २०० ते २५० mcft पाण्याची अतिरिक्त आवश्यकता असल्याचे दादांच्या निदर्शनास आणून देत आवर्तन कालावधी वाढविण्याची मागणी केल्याचं सुजय विखेंनी लिहिलं आहे.
मागणी दादांनी मागणी मान्य करून माणिकडोह व वडज या दोन धरणांतून साधारणतः २०० mcft एवढे अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश दिले आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचंही सुजय विखेंनी लिहिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील निलेश लंके यांना शरद पवारांच्या पक्षात प्रवेश न करण्याचा सल्ला दिला होता. त्यासोबत निलेश लंके हे फक्त पारनेर पुरते मर्यादित आहे. लोकसभेला शेगाव, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा शहर, राहुरी, कर्जत या मतदारसंघांचा समावेश येतो. त्यामुळे निलेश लंके यांनी पुन्हा विचार करावा असा अजित पवारांनी सल्ला दिला होता.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
निलेश लंके यांनी जर शरद पवार यांच्या पक्षामधून निवडणूक लढवली तर अजित पवार लंकेंचा काटा काढण्यासाठी नगर दक्षिण मतदारसंघात एक ते दोन सभा घेण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची अजित पवार आणि सुजय विखे पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.