• Tue. Mar 17th, 2026
    चाळीस पोलिसांना अन्नातून विषबाधा, नऊ जणांची प्रकृती गंभीर, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

    चंद्रपूर: चाळीस प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलं. यातील नऊ पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी उपवास पकडला होता. त्यात आज मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असे सांगण्यात येत आहे.
    मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला आग, हेरिटेज रूमसह चार खोल्या जळून खाक, लाखोंचं नुकसान
    मिळालेल्या माहितीनुसार, गृह विभागाने काही महिन्याअगोदर पोलीस भरती घेतली होती. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे दोनशे पोलीस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणार्थी म्हणून पाठविण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात राहत असून याच परिसरातील कॅन्टिनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण ते करतात. आज (रविवार) सकाळ पाळीत सुमारे चाळीस प्रशिक्षणार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील नऊ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

    तुम्ही माझी लोकसभेत काळजी घ्या, भर सभेत ज्येष्ठ नेत्यांची नावं घेत पंकजा मुंडेंची साद

    या घटनेची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार जेवणाचे नमुने घेण्यात आले आहेत. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेतील अहवालानंतर समोर येणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed