• Thu. Jun 11th, 2026

    रामदास कदमांचे ते शब्द ऐकून खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हणाले, कोण तो रवींद्र चव्हाण…

    रामदास कदमांचे ते शब्द ऐकून खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हणाले, कोण तो रवींद्र चव्हाण…

    रत्नागिरी: महायुतीमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चार दिवसांपूर्वी भाजपावर टिकास्त्र सोडले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा रामदास कदम यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे. दापोली मतदारसंघात आमदार योगेश कदम यांना त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्याकडून संपवण्याचे प्रयत्न झाले आणि आज महायुती असताना देखील इथल्या स्थानिक भाजपकडून देखील हा प्रयत्न चालू आहेत. कोण तो रवींद्र चव्हाण तो इथे दहा पंधरा कोटीची कामे घेतो कोण तो भाजपाचा आमदार संजय केळकर तो इथे येऊन भूमिपूजन करतो, आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री इथे दापोली देऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवरती अधिकार सांगतो हक्क सांगतो. अरे हे तुमचं चाललंय काय अशा शब्दात रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा, असेही रामदास कदम यांनी व्यासपीठावरूनच मुख्यमंत्र्यांना सांगितले.

    एकनाथ शिंदेंचं कौतुक

    होय, शिंदे साहेब आपले ४० आमदार असताना त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं, पण जहाल शिवसेनेला ४० आमदार, १३ खासदार आणि दहा अपक्ष घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात, बाकी कुणाची ताकद नव्हती, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

    उद्धव ठाकरेंचाही घेतला समाचार

    यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही जोरदार समाचार घेतला. ज्या वेळेला कोकणावरती नैसर्गिक संकटं आली, वादळ आलं तेव्हा कोकणातला सगळा मच्छीमार संपला होता, देशोधडीला लागला होता, सगळ्यांची घरं उध्वस्त झाली होती, त्यावेळेला शरद पवार यांच्यासारखे ८२ वयाचे जेष्ठ नेते कोकणात येऊन चार दिवस बसले होते. आमदार योगेश कदम यांनीही रात्रंदिवस काम केलं. त्यावेळेला अजित दादांनीही योगेश कदमला मदत केली. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्लू हे दोघेही इथे बघायला आले नाहीत. कोकणातल्या मच्छीमारांचे अश्रू पुसण्यासाठी या उद्धव ठाकरेंना वेळ मिळाला नाही, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. आता हेच उद्धव ठाकरे सगळ्या ठिकाणी सभा घेताय, पळताय, उद्धव ठाकरेला पळायला एकनाथ शिंदे तुम्हीच लावलेत. शिंदे साहेब तुम्हीच त्यांना मातोश्रीतून बाहेर काढाल. अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, पण केवळ दोन वेळा मंत्रालयात आले, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed