जळगाव जिल्ह्यात भाजपाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झाला. यावेळी त्यांनी युवकांच्या संमेलनाला संबोधित करतांनाच तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन करीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी खान्देशातील विद्यमान खासदारांसोबत नव्यानेच बांधलेल्या भाजप कार्यलयात चर्चा केली. भाजपाने अद्याप महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहिर केलेले नसली तरी खान्देशातील चारही खासदार उन्मेश पाटील(जळगाव), रक्षा खडसे (रावेर), डॉ. सुभाष भामरे (धुळे) व डॉ. हिन गावित (नंदुरबार) यांना पुन्हा उमेदवारी द्यावी की नाही, याबाबत पक्षाकडून चाचपणी सुरु आहे. अमित शहा यांनी देखील या जळगाव दौऱ्यातून या खासदारांची मागील पाच वर्षाच्या कामकाजाची प्रगती पुस्तके तपासल्याची चर्चा आहे.
अद्याप खान्देशातील खासदारांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून स्पष्टता झाली नसली तरी जळगाव शहरातून उन्मेश पाटील यांच्या ऐवजी मागील निवडणुकीत ऐनवेळी डावलल्या गेलेल्या माजी आमदार स्मीता वाघ किंवा भाजपात प्रवेश केलेले सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे याच्यापैकी एकास उमेदवारी मिळणार असल्याची माहिती भाजपाच्या गोटातून मिळाली आहे. दुसरीकडे रावेरला रक्षा खडसे, धुळ्याचे डॉ. भामरे व नंदुरबार गावित यांच्या उमेदवारीबाबत अद्याप तळ्यात मळ्यात सुरु असल्याचेही सांगितले जात आहे.
स्मीता वाघ यांची उमेदवारी निश्चित झाल्यास भाजपाकडून खान्देशात तीन महिला उमेदवार होण्याची शक्यता असल्याने रावेरमधून रक्षा खडसे यांची किंवा नंदुरबारमधून डॉ. गवित या दोघांपैकी एक उमेदवारी बदलण्याची दाट शक्यता आहे. डॉ. भामरे यांच्याऐवजी निवृत्त अधिकारी प्रतापराव दिघावकर यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चाचपणी केली जात आहे. आगामी ८ दिवसातच उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी भाजपाकडून घोषित होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांसह इच्छुकांची घालमेल वाढली आहे.