विविध विकासकामे तसेच जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिर्डी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी महायुती समोर हा नवीन फॉर्म्युला ठेवला आहे. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आठवले म्हणाले की, जागा वाटपावरुन जास्त ओढाताण करून चालणार नाही. भाजप कोणाचा पक्ष संपवायला चाललाय असं अजिबात नाही आणि संपविण्याचा प्रयत्न केला तरी पक्ष संपत नसतो. माझ्या पक्षाचे लोक निवडून आले नसले तरी माझा पक्ष काय संपला नाही. मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री असताना मला चांगली संधी उपलब्ध होईल. नरेंद्र मोदी २०२४ मध्ये तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहे तर मी मंत्री होणारच आहे आणि माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मी याठिकाणी शेतकरी, दीनदलित, व्यापारी यांच्यासह शिर्डी संस्थानाला बळकट करण्यासाठी मी काम करेल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बौद्ध समाजाला संधी मिळावी
सर्व समाज आपलाच आहे, सगळ्या समाजातील माझे मित्र आहे, मी सुरवातीला हरलो. त्यानंतर बौद्ध समाजाला संधी अजून मिळाली नाही. या मतदारसंघात बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २००९ नंतर या मतदासंघात बौद्ध समाजाला संधी मिळाली नाही. अनुसूचित जातीत बौद्ध समजाची संख्या जास्त असल्याने उमेदवारी संदर्भात बौद्ध बांधवांच्या अपेक्षा असतील तर भाजपने याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांचा अपमान करत आहे
प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर वेल अँड गुड परंतु ते भाजपसोबत येणार नाही, ना ते महाविकास आघाडी सोबत राहणार. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची त्यांची अनेक वर्षांची भूमिका आहे आणि सर्व ४८ जागा ते लढतील अशी मला अपेक्षा आहे., ते बाबासाहेबांचे नातू असून महाविकास आघाडी त्यांचा अपमान करत असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे.
माझा कोणीही अपमान करत नाही
माझा कोणी अपमान करत नाही. मी राज्यमंत्री आहे. माझ्या पक्षाचे खासदार नसताना मला मंत्रिपदाची संधी दिलीय. माझा अपमान कोणी करू शकत नाही आणि मी कोणाचा करत नाही. अलीकडच्या काळात राजकरण बदललं आहे. पूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र काम करायचे. बदललेल्या राजकारणाला बदलणं आवश्यक असल्याचे म्हणत विनायक राऊतांनी केलेल्या आरोपांना आठवलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शाहू महाराजांनी ‘मविआ’कडून पराभूत होणे योग्य नाही
छत्रपती संभाजीराजे आमच्या सोबत असताना त्यांना आम्ही खासदार केलं आहे. शाहू महाराजांना निवडून येणं आवश्यक असून महाविकास आघाडीच्या कोणत्याही तिकिटावर उभे राहून त्यांनी हरणे योग्य नाही. शाहू महाराजांना निवडणूक लढवायची असेल तर महायुती बरोबर येणं योग्य राहील असं देखील आठवलेंनी म्हटलं आहे.