विरोधी पक्षाची टीका अनाठायी ठरवताना मुख्यमंत्र्यांना सभागृहात मोदी महात्म्य सांगण्याचा मोह आवरला नाही. ‘गेल्या ५० वर्षांत देश बुडविणारा पक्ष कोणता, अशी विचारणा करत बुडालेल्या द्वारकेचे दर्शन घेऊन देशाच्या विकासासाठी मोदींनी प्रार्थना केल्याचा दाखला त्यांनी दिला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. अयोध्येत राम मंदिर बांधले. काही लोक बोलत होते, मंदिर बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे, पण मोदींनी मंदिर बांधले आणि तारीखही सांगितली’, असे शिंदे म्हणाले.
‘विरोधक कोमात गेले आहेत. त्यामुळे ते शेतकरी कोमात गेल्याचा आरोप करतात. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आहेत. मात्र, तुमचे सरकार असताना तुम्ही त्यांच्या तोंडाला पाने पुसली’, असेही शिंदे म्हणाले. ‘२०१४च्या लोकसभा निवडणुकीत अनेक घोटाळे बाहेर आले. आधी करप्शन फर्स्ट होते, इथे नेशन फर्स्ट आहे. पूर्वी केंद्र सरकारकडून एक रुपया दिला तर नागरिकांपर्यंत १५ पैसे पोहोचायचे, म्हणजे ८५ टक्के भ्रष्टाचार होता. आता थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे पूर्ण एक रुपया पोहोचतो. तुमचे सरकार असते तर शेतकऱ्यांना ३५ हजार कोटी रुपयांची मदत देताना त्यातील ३० हजार कोटी रुपये हडप झाले असते. फक्त ५ हजार कोटी पदरात पडले असते’, अशी टीका शिंदे यांनी विरोधकांवर केली. ‘अवकाळी पावसानंतर आम्ही चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. तिथे पाहणी करून आम्ही मदत जाहीर केली, आम्ही फेसबुक लाइव्ह करीत बसलो नाही’, असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
‘गेल्या १० वर्षांत मोदी यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पित केले आहे’, असे शिंदे म्हणाले. ‘आम्हाला खोके खोके म्हणणाऱ्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतले आहेत. त्याची आता चौकशी सुरू आहे. अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सर्व सिंचन प्रकल्प बंद पाडले होते. पण, आम्ही १२१ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. यातून १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
शिंदे यांचे विरोधकांच्या प्रस्तावावर उत्तर सुरू असताना, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, अशी टिप्पणी जागेवर बसून केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याला हसून दाद दिली.
‘मराठा आरक्षण टिकणार’
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला आहे. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकणारे असून आगामी पोलिस आणि शिक्षक भरतीत हे आरक्षण लागू राहील. मराठा आरक्षणावरून जातीजातीत विष कालवण्याचा प्रयत्न सफल होणार नाही, असे शिंदे यांनी ठणकावले. आम्ही वेगाने काम करत आहोत म्हणून विरोधक सैरभर झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘जितेंद्र आव्हाड लक्ष्य’
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सभागृहात आम्हाला संस्कृतीबद्दल शिकवत आहेत. ज्यांनी मंत्री असताना स्वतःच्या बंगल्यामध्ये करमुसे नावाच्या व्यक्तीला पट्ट्याने, काठीने काळे-निळे होईपर्यंत मारले. एका मॉलमध्ये एका पत्नीच्या समोर तिच्या नवऱ्याला मारले. ते आम्हाला कसे संस्कृती शिकवू शकतात’, असा प्रश्न करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हाडांना लक्ष्य केले.