नेमकं काय घडलं?
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात शाब्दिक चकमक आणि नंतर धक्काबुकी झाल्याचे कळते. पक्षातील अंतर्गत वाद चर्चेचा विषय ठरला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी दोन्ही सभागृहात विविध विषयांवर चर्चा सुरू होती. या दरम्यान विधिमंडळाच्या लॉबीमधून मंत्री दादा भुसे जात असताना आमदार थोरवे त्यांच्याशी विकासकामाबाबत बोलले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून धक्काबुक्की झाली.
लॉबीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी धाव घेत दोघांमध्ये मध्यस्थी केली. यामुळे सत्ताधारी शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसून अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा विधिमंडळात सुरू झाली.
दरम्यान, मंत्री दादा भुसे व आमदार थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा काय पुरावा आहे, जे घडलेच नाही ते तुम्ही कसे काय दाखवता, असा उपरोधिक सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांना केला. दादा भुसे व थोरवे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असताना त्यांचा आवाज वाढला, त्यापलिकडे काहीही झालेले नाही. आमदार त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते. थोरवे यांच्या मतदारसंघातील विकासकामासंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठरले आहे, असे देसाई यांनी विधीमंडळाच्या दोन्हीही सभागृहात स्पष्ट केले. दरम्यान, विधिमंडळातील तळमजल्यावर सध्या वायरिंगची कामे सुरू आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
‘त्यांच्या घरचे जेवायला जात नाही’
‘मतदारसंघातील रस्त्याचे काम मंत्र्यांकडे दिले होते. एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी जाणीवपूर्वक मी दिलेले काम येऊ दिले नाही. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगूनही दादा भुसे काम करत नाहीत. कोणत्याही आमदारासोबतचे त्यांचे वर्तन चांगले नसते. माझा आवाज वाढला, वाद झाला. आम्ही लोकांची कामे घेऊन जातो. त्यांच्या घरचे जेवायला जात नाही’, असे महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.
Read Latest National News Updates And Marathi News
“आम्हीही आमदार आहोत.. मंत्र्यांनी आमच्याशी उद्धट वर्तन केलं, तर आम्ही आमचा स्वाभिमान दूर लोटू शकत नाही. ते माझ्याशी उच्च स्वरात बोलले, म्हणून मला त्यांना सांगावं लागलं, की आवाज चढवू नका. मी दोन महिन्यांपासून एका कामाचा पाठपुरावा करत होतो. मी म्हटलं की तुम्ही इतर कामं करताय, फक्त माझंच काम टाळताय. मी काही वैयक्तिक काम सांगत नव्हतो. मंत्री हे आमदारांमुळे निवडले जातात. ते मुद्दाम माझं काम करत नव्हते. दादा भुसेंमध्ये प्रचंड नकारात्मकता आहे. ते आमदारांना मान देत नाहीत. सुहास कांदेंना विचारा, ते पण हेच सांगतील” असं महेंद्र थोरवे यांनी सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.