• Sat. Sep 21st, 2024

अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक गावांना सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विभागातील २२२ गावांमधील १९ हजार १५० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. एकाच वर्षात एकाच हंगामात दोन वेळा अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

नाशिक विभागात गेल्या चार दिवसांत ८ तालुक्यांतील २२२ गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. यापैकी काही गावांत तर पावसाळ्यात देखील झाला नाही इतका मुसळधार पाऊस झाल्याने रब्बी पिके उद्ध्वस्त झाली. या अस्मानी संकटाचा विभागातील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांना फटका बसला असून, त्यांच्या शेतातील कांदा, पपई, मका, गहू, हरभरा, तीळ, ज्वारी, बाजरी, भाजीपाला अशा पिकांचे मातेरे झाले. कृषी विभागाकडून या नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याने नुकसानीची आकडेवारी प्रशासनाकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

नाशिक विभागात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या २२२ गावांपैकी तब्बल २१५ गावे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यातील चाळीसगाव, धरणगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा आणि अमळनेर या सहा तालुक्यांत अवकाळी पावसाने हैदोस घालून २१ हजार ६७ शेतकऱ्यांच्या १८ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावरील रब्बीची पिके उद्ध्वस्त केली. तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील अनुक्रमे एक आणि सहा गावांत अवकाळीचा फटका बसला आहे.

एकाच हंगामात दोन वेळा गारपीट

चालू वर्षाच्या रब्बी हंगामात अवकाळी आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा मारा सहन करावा लागला. यापूर्वी गेल्या २६ नोव्हेंबर रोजी विभागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढल्याने १३४९ गावांतील ८६ हजार ६११ शेतकऱ्यांच्या ४४ हजार २४१ हेक्टरवरील रब्बी पिकांचे मातेरे केले होते. द्राक्ष आणि कांदा पिकाचे या गारपिटीमुळे होत्याचे नव्हते झाले होते. या संकटातून स्वतःला कसेबसे सावरत पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी शेतात पिके उभी केली होती. ही पिके कापणीला आलेली असतानाच पुन्हा एकदा वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त होऊ शकलेली नाही.
रात्रंदिवस आम्ही शेतात राबलो, अवकाळी पावसाने सारं हिरावलं, कर्ज कसं फेडणार?; शेतकरी महिलेचा आक्रोश
नाशिक विभागातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान –
तालुका — बाधित क्षेत्र (हेक्टर मध्ये) — बाधित शेतकरी— बाधित गावे

धुळे —२२०—३३४—६
नांदगाव —५४—८१—१
चाळीसगाव —३५९३—५६५२—३२
धरणगाव —१३५—३५४—१६
चोपडा —४९९०.२०—५१५०—४१
भडगाव —९२.३१—१७३—१३
पारोळा —६३७५—७२००—४८
अमळनेर —३६९०—२५३८—६५
विभाग एकूण —१९१४९.५१—२१४८२—२२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed