• Fri. Mar 13th, 2026

    नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण

    नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण

    म. टा. प्रतिनिधी, बीड: जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आष्टी ते अमळनेर या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी ऑनलाइन झाले. जिल्ह्यातील हा टप्पा आता रेल्वेच्या वाहतुकीसाठी खुला होईल.बीड हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यात सर्वांत कमी रेल्वेचे जाळे या जिल्ह्यात आहे. त्यामुळे अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे. त्यास १९९५ मध्ये तांत्रिक मान्यता देऊन हा रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आला. या २६१ किलोमीटरच्या मार्गाला सुरूवातीला केवळ ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या साठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे करेल असे ठरले होते. या मार्गासाठी सुरुवातीला कधीच भरीव निधी दिला गेला नाही. त्यासाठी बीडमध्ये अनेक आंदोलने झाली. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वेमार्गाची बोळवण केली जायची.

    अनेक जण या या प्रश्नी राजकारण करून खासदार झाले मात्र प्रश्न सुटला नाही. परळी- बीड-नगर रेल्वेमार्गाला निधी देण्यास टोलवाटोलवीच केली. त्यामुळे बीडची रेल्वे म्हणजे चेष्टेचा विषय बनली होती. अनेक वर्षे हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वेमार्गासाठी २,८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे बीडशेजारच्या लातूर जिल्ह्याचे, त्यांनी प्रथम शेजारधर्म निभावत कामाचा अर्धा वाटा उचलण्यास मंजुरी दिली. मात्र, तरीही फारसे पैसे या प्रकल्पास मिळाले नाहीत.

    गुड न्यूज, म्हाडाची मराठवाड्यात सोडत, ९४१ घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया, जाणून घ्या सविस्तर

    केंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी या २५ वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले व त्याचे काम प्रगतीपथावर आले. या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिलेला आपला निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १,४४३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा रेल्वे प्रकल्प भारतीय जनता पक्षाचे बीडचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेवून राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केले होते. त्यामुळे रेल्वेमार्ग हवेत विरतो की, काय अशी शक्यता वाटत असताना निधी मिळाल्याने कामाला गती आली. २०२२ पर्यंत नगर ते बीडपर्यंत रेल्वे धावली पाहिजे असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

    सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्यांनी परळी येथे येऊन या मार्गास गती दिली. याचा एक टप्पा म्हणून नगर ते नारायणडोह या साडेबारा किलोमीटरवरील रेल्वेमार्गावर मार्च २०१७ मध्ये रेल्वेचे इंजिन धावले होते. नगर जिल्ह्यातील साडेबारा किलोमीटरनंतर पुढचा टप्प्यात नारायणडोह ते बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडीपर्यंतच्या चोवीस किलोमीटर रेल्वे रूळ अंथरणे काम पूर्ण झाले होते व नगर ते सोलापूरवाडी या चाळीस किलोमीटरवर चाचणी दहा डब्याची रेल्वे फेब्रुवारी २०१९ मध्ये या मार्गावर धावली. त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी या तीस किलोमीटरवरील पूर्ण झालेल्या या मार्गावर बारा डब्यांची चाचणी रेल्वे धावली. त्यामुळे आष्टी शहर रेल्वेने देशातील इतर भागाशी जोडले गेले. आता आष्टी ते अमळनेर या मार्गावर काम पूर्ण झाले असल्याने अमळनेर-आष्टी रेल्वेमार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. पंतप्रधान मोदी बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांच्या हस्ते ऑनलाइन या रेल्वेस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली आहे.

    कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर धोकादायक परिणाम होणार नाही | पंकजा मुंडे

    या वेळी रेल्वेचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नंतर या पुढच्या टप्यात अमळनेर व अमळनेर ते बीड मार्गावरील रेल्वे रूळ अंथरण्यास सुरुवात होणार आहे. बीड जिल्ह्यातील अमळनेरपर्यंतची कामे पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वे धावली असल्याने आगामी काळात लवकर बीडकर जनतेचे रेल्वेचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed