माझ्या सलाइनमधून विष देऊन मारण्याचा मला प्रयत्न होता तसेच देवेंद्र फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा जरांगेंनी केला होता. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जरांगेंच्या आरोपांवर विचारलेल्या प्रश्नांना फडणवीसांनी उत्तर दिलं.
“पत्रकारांना तरी पटतंय का….”
जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. हे तुम्हाला (पत्रकारांना) तरी पटतंय का? तुम्हीही काहीही प्रश्न विचारता. तुम्हीच सांगा हे खरं आहे का? असा उलट सवाल फडणवीसांनी विचारला. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. कायदा, सुव्यवस्था न बिघडवता कोणीही आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल, असंही त्यांनी निक्षू:न सांगितलं.
सागर बंगला हा सरकारी, तिथे कुणीही येऊ शकतं
सागर बंगला हा सरकारी आहे. सरकारी कामाने कुणीही सागर बंगल्यावर येऊ शकतो. कोणाचीही अडवणूक होणार नाही. मात्र, कोणत्या निराशेतून जरांगे बोलत आहेत, त्यांना कोणती सहानुभूती हवी आहे ते कळत नाही. त्यांचे आरोप अत्यंत खोटे आहेत, असं फडणवीस म्हणाले.
मी मराठा समाजासाठी काय केलं हे सगळ्यांना माहिती
मी मराठा समाजासाठी काय केलं? हे सगळ्यांना माहिती आहे. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाची सुरुवात मीच केली. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कुणी काही बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं मला वाटत नाही, असंही फडणवीस म्हणाले.
