• Sat. Mar 7th, 2026
    कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात

    डोंबिवली: कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शुक्रवारपासून भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. त्यावरुन राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

    म्हणून त्यांनी शिवछत्रपतींचे नाव घेतले नसावे…

    आपण अनेकदा सांगितले आहे की आपल्याकडचे महापुरुष आपण जातीमध्ये विभागून टाकलेले आहेत आणि या महापुरुषांवरुन राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. तसेच, जाहीर मुलाखतींमध्येही आपण त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू-फुले – आंबेडकर नेहमी बोलतात, मात्र छत्रपतींचे नाव कधीही घेत नाहीत. शिव छत्रपतींचे नाव घेतल्यामुळे मुस्लिम समाजाची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्षे काढली आणि आता त्यांना महाराज आठवले असल्याचे सांगत राज ठाकरेंनी शरद पवारांच्या राजकारणावर भाष्य केले.

    लवकरच लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार

    येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेसाठी आज केवळ चाचपणी करतोय. आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुंबईत बैठका झाल्या. तर शाखाध्यक्षपर्यंतच्या बैठका आम्ही आता सुरू केल्या असून मुंबई आणि ठाणे अशा बैठका झाल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत. तसेच, लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिकाही आपण लवकरच स्पष्ट होईल, असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    लोकसभा निवडणुकीबाबत लवकरच भूमिका स्पष्ट होईल…

    लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. काही दिवसच शिल्लक असून मनसेची लोकसभेबाबतची भूमिकाही लवकरच स्पष्ट होईल असे सांगत लोकसभेबाबतचा सस्पेन्स राज ठाकरे यांनी कायम ठेवला. तर एखादा माणूस पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करण्यासारखी टोकाची भूमिका घेतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मतही राज ठाकरे यांनी गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर मांडले.

    आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणे आवश्यक…

    एखादा आमदार एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर जेव्हा गोळीबार करतो त्यावेळी त्या आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणे आवश्यक आहे पोलिसांनी त्यानुसारच सखोल चौकशी केली पाहिजे असे राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed