• Sat. Sep 21st, 2024

शिक्षकांवरील ओझे कमी, मुंबईत निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा निर्णय, संपूर्ण राज्यात आदेश लागू करण्याची मागणी

शिक्षकांवरील ओझे कमी, मुंबईत निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा निर्णय, संपूर्ण राज्यात आदेश लागू करण्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऐन परीक्षाकाळात निवडणुकीच्या कामाचे ओझे पेलणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसंदर्भातील ‘बीएलओ’च्या कामातून या शिक्षकांची मुक्तता करण्याचा निर्णय राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आहे. मात्र, हा निर्णय मुंबईतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू नसल्याचे त्यांनी प्रसृत केलेल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय, हे पत्र संदिग्ध असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.’परीक्षा कालावधीत ‘बीएलओ’साठी नियमित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घेतल्यास शाळा चालवणे अवघड होईल. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’च्या कामातून वगळण्याची मागणी शिक्षक भारती, शिक्षक संघटनांसह मनसेने केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिकाही मांडली होती. शिक्षक वर्तुळात ही मागणी जोर धरू लागल्याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी एक पत्रक प्रसृत केले आहे.

चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग होणार नाही? शिंदे कोंडीत, भाजपच्या प्रस्तावानं वेगळीच अडचण

सरसकट शिक्षक वर्गाला निवडणूक कर्तव्यार्थ आणि मतदारयादी बनविण्याचे कायमस्वरूपी काम देणे हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे ठरू शकते, ही बाब श्रीकांत देशपांडे यांनी मान्य केली. ‘बीएलओ पातळीवरील कामातून शिक्षकांना दिलासा देता येईल. मात्र, निवडणुकीचे कामही महत्वाचे आणि तातडीचे असल्याने लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदींनुसार संबंधित स्थानिक प्राधिकारी संस्थेने आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. त्यासाठी शिक्षकांव्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील कर्मचारी उपलब्ध करून देता येईल, असेही देशपांडे यांनी या पत्रात म्हटले आहे.

आयुक्त व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी यासंदर्भात तातडीने एकत्रित बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी वर्ग अधिगृहित करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’चे काम देण्याबाबत पर्याय वापरण्यात यावा, असे या पत्रात म्हटले आहे.

पुण्यात मनसेचा मोर्चा, अमित ठाकरेंनी गाडीवर उभं राहून कार्यकर्त्यांना काय संदेश दिला?

दरम्यान, शैक्षणिक कर्तव्यार्थ असलेल्या कर्मचाऱ्यास निवडणूक काम असल्यास त्याच दिवशी शैक्षणिक काम असणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या निर्णयावरून पुन्हा संभ्रम निर्माण झाला असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

निर्णय राज्यभरात लागू करण्याची मागणी

मुंबई शहर व उपनगरातील शालेय शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याबाबत निर्देश दिल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यभरातील शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला. शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने मुंबईतच नव्हे; तर राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यासाठी हा आदेश लागू करावा, अशी मागणी आमदार तांबे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.

‘बीएलओ’ म्हणजे काय?

‘बीएलओ’ म्हणजे ‘बूथ लेव्हल ऑफिसर’. मतदारयादीतील नावामध्ये दुरुस्ती करणे, फोटोपास काढणे, मृत व्यक्तींचे नावे वगळणे, अतिरिक्त नावांचा समावेश करणे, स्थंलातर करणाऱ्यांची यादी अद्ययावत करणे आदी कामे ‘बीएलओ’च्या पातळीवर होतात.

निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेले पत्र संदिग्ध असून, याचा वेगळा अर्थ लावून पुन्हा शिक्षकांना कामाला लावले जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांना या निवडणुकीच्या कामातून पूर्णपणे वगळणे आवश्यक आहे.
-अनिल बोरनारे, निमंत्रित सदस्य, प्रदेश कार्यकारिणी भाजप महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed