• Sat. Sep 21st, 2024

लोकसभेला पराभव, मतदारसंघात बॅनर, हातून गेलेलं दादर; जोशी सर न् मातोश्रीतला दुरावा कसा वाढला?

लोकसभेला पराभव, मतदारसंघात बॅनर, हातून गेलेलं दादर; जोशी सर न् मातोश्रीतला दुरावा कसा वाढला?

मुंबई: शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती असा चढता प्रवास जोशी यांनी केला. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाचा शांत, संयमी, व्हाईट कॉलर चेहरा अशी त्यांची ओळख होती. जोशी सर असा त्यांचा उल्लेख व्हायचा.

नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. यानंतरच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं, सर्वसामान्यांचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यासाठी मनोहर जोशी व्यासपीठावर आले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मनोहर जोशींनी व्यासपीठावरुन निघण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. मी बेबंदशाही खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे त्यावेळी केलेल्या भाषणात म्हणाले होते.
जोशी सर ताटकळत, रिबेका मार्क बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर अन् नाराजीनाट्य; काय घडलेलं?
बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. जोशी मुख्यमंत्री असले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांकडेच होता. १९९९ मध्ये शिवसेना, भाजपची राज्यातील सत्ता गेली. पण याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशी मुंबई मध्य मतदारसंघातून विजयी झाले आणि लोकसभेवर गेले. २००२ ते २००४ या कालावधीत ते लोकसभेचे सभापती होते.

२००४ पासून मनोहर जोशींच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री, लोकसभेच्या सभापतींचा मुंबईत झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठी नामुष्की होती. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली. २००९ मध्ये जोशी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण त्यांना तिकीट नाकारलं गेलं. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यावर त्यांच्या जागी अनिल देसाईंना संधी दिली गेली.
माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या कालावधीत शिवसेनेतील तिकीट वाटपाचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरेंकडे होते. राज ठाकरे, नारायण राणेंसारख्या नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेनेत उद्धव पर्व सुरू झालं होतं. प्रकृतीच्या कारणांमुळे बाळासाहेब पक्षात फारसं लक्ष घालत नव्हते. मनोहर जोशींना फारशी संधी दिली जात नव्हती.

२०१२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनोहर जोशींच्या निकटवर्तीयांना दादरमध्ये पराभव पाहावा लागला. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दादरमधील बहुतांश जागा खिशात घातल्या. त्यामुळे हा पराभव शिवसेनेसाठी सेटबॅक होता. आधी लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि मग महापालिका अशा सलग तीन निवडणुकांमध्ये दादरमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. यासाठी जोशींची रणनीती जबाबदार असल्याची टीका झाली.
बाळासाहेबांच्या एका आदेशावरुन मनोहर जोशींनी मुख्यमंत्रिपद सोडलेलं; तेव्हा नेमकं काय घडलेलं?
नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. यानंतर पक्षाची सगळी सुत्रं उद्धव ठाकरेंकडे गेली. पक्षात बाजूला पडलेले मनोहर जोशी पुन्हा लोकांमध्ये दिसू लागले. मातोश्रीवर त्यांचा वावरही वाढला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचं आव्हान ठाकरेंसमोर होतं. त्यावेळी जोशींना दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. याआधी झालेल्या पराभवानंतरही त्यांना विजयाचा विश्वास होता. पण दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंनी राहुल शेवाळेंना बळ दिलं.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहुल शेवाळेंचे बॅनर झळकू लागले. त्या माध्यमातून जोशींना अप्रत्यक्षपणे संदेश देण्यात आला. यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता शरसंधान साधलं. त्यावेळी बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय चर्चेत होता. ‘जर बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांच्या स्मारकासाठी इतकी वाट पाहावी लागली असती, तर त्यांनी थेट सरकारच पाडलं असतं,’ असं म्हणत जोशी सरांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
मनोहर जोशी बाळासाहेबांच्या प्रभावानं शिवसेनेत,मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्षपदापर्यंत मजल,असा होता राजकीय प्रवास
मनोहर जोशी नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. जोशींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरग पवार यांची भेट घेतल्यानं या चर्चांनी आणखी जोर धरला. जोशी पक्ष नेतृत्त्वावर दबाव टाकत असल्याचं चित्र निर्माण झालं. दक्षिण मध्य मुंबईतून तिकीट मिळणार नसल्याचं जोशींना समजलं. त्यांना पक्षाकडून कल्याण पर्याय देण्यात आला. पण इतक्या बड्या नेत्यानं बालेकिल्ला सोडणं अवघड होतं. त्यातच जोशींनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी बिकट बनली. या सगळ्याचा परिणाम अखेर दसरा मेळाव्यात दिसला. जोशी व्यासपीठावर आले. शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती पाहून जोशींनी काढता पाय घेतला. यावेळी ठाकरेंनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed