• Sat. Sep 21st, 2024

All the Best! बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

All the Best! बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला मुंबई विभागातून ३ लाख ५१ हजार ६०६ विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये १ लाख ८३ हजार ८१८ विद्यार्थी आणि १ लाख ६७ हजार ७७९ विद्यार्थिनी आहेत. एकूण १,४१५ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. तर राज्यातून परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ३,३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

मुंबई विभागातील एकूण ६६८ केंद्रांवर ३ लाख ५१ हजार ६०६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने सात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय महसूल विभागाची एकूण नऊ भरारी पथकेही असतील. दरम्यान, गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२४च्या परीक्षेसाठीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिकची वेळ वाढवून देण्यात आली आहे.

परीक्षांच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळस्तरावरून १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. याचबरोबर राज्य मंडळ व नऊ विभागीय मंडळांत नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

– विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी ०२२-२७८९३७५६, २७८८१०७५ या क्रमांकांवर मदत मागू शकतात.
– परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
– सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी २.३०पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे
– ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटर यासाठी परवानगी मात्र कॅल्क्युलेटर मोबाइल किंवा इतर कुठल्या ही यंत्रात असू नये
‘जी-पॅट’ शिष्यवृत्तीसाठी पत्राधार; विद्यार्थ्यांचे यूजीसीला साकडे, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचचा पाठिंबा
शाखानिहाय मुंबई विभागातील विद्यार्थी
विज्ञान शाखा : १२७,६८०
कला शाखा : ४७,१०९
वाणिज्य : १,७२,५३३
वोकेशनल : ३४०९
आयटीआय : ८७५
एकूण विद्यार्थी : ३,५१,६०६

ठाण्यातील १ लाख ७ हजार ५२० विद्यार्थी देणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण १ लाख ७ हजार ५२० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी १९८ केंद्रे निवडण्यात आली. तसेच शिक्षण विभागाची सहा आणि महसूल विभागाची काही भरारी पथके तैनात असणार आहेत. दरम्यान, यंदाही कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed