• Thu. Mar 12th, 2026
    क्रिकेट सामना जिंकण्याची व्यूहरचना आखत होते पण नियतीपुढे हरले

    अमरावती : अमरावतीमध्ये काल झालेल्या अपघाताने समाजमन सुन्न झाले असतानाच घटना क्रमाचा होत असलेला उलगडा धरकाप उडवणारा आहे. २३ जणांच्या समूहाला क्रिकेट या खेळाच्या धाग्याने एकत्र आणले होते. पण, क्रिकेटचा डाव सुरू होण्यापूर्वीच त्यापैकी चौघांना काळाने हिरावून नेले. उत्साहाच्या वातावरणात निघालेल्या क्रिकेटपटूंना वाटेत काय वाढून ठेवले, याची किंचितही कल्पना नव्हती. एका बेसावधक्षणी वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यांचे पार्थिव पाहून अनेकांचे काळीज थरथरले. सर्वत्र शोककळा पसरली.अमरावती शहरातील २३ तरुणांचा समूह रविवारी सकाळी एका मिनीबसने यवतमाळ येथील क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाला. श्रीहरी विजय राऊत मार्गात सामना जिंकण्याच्या उद्देशाने त्यांच्यात क्रिकेटच्या बारकाव्यांविषयी चर्चा सुरू होती. व्यूहरचना पूर्ण होत असतानाच ओपनर प्लेअर ठरले होते. मात्र, अमरावती-यवतमाळ मार्गावरील शिंगणापूर चौफुलीवर एका बेसावधक्षणी त्यांच्या मिनीबसचा अपघात झाला. रसायन वाहून नेत असलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
    अमरावतीत खासगी बस अन् काँक्रिट मिक्सरचा भीषण अपघात, क्रिकेट स्पर्धेसाठी निघालेल्या तरुणांचा मृत्यू, १० जण जखमी
    या अपघातात क्रिकेटचा सामना जिंकण्यापूर्वीच चौघांना मृत्यूने हरविले. तर चालकासह उर्वरित सर्व खेळाडू जायबंदी झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी नातेवाइकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. या अपघातात संदेश संजय पाडर (वय २३, रा. वल्लभनगर), श्रीहरी विजय राऊत (वय २०, रा. यशोदानगर), सुयश प्रमोद अंबतें (वय २२, रा. चैतन्य कॉलनी) आणि आयुष नितीन बहाळे (वय १८, रा. कवठा बहाळे) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वल्लभनगर, सुयश अंबर्त, चैतन्य कॉलनी, यशोदानगर परिसरात शोककळा पसरली.

    संदेश पाडर हा पदवीधर होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील व बहीण आहे. श्रीहरी राऊत हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. आयुष बहाळे याच्या घरी आई, वडील आहेत. सुयश अंबतें याचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले होते. तर आयुष बहाळे हा शिक्षणानिमित्त येथील साईनगर परिसरात स्थायिक झाला होता. तो इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत होता, अशी माहिती समोर आली आहे.

    शहरातील विविध कार्यक्रम रद्द

    श्री. हनुमान मंदिर, वल्लभनगरतर्फे १८ व १९ फेब्रुवारी रोजी कळसारोहण निर्माणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु, शिंगणापूर येथील अपघातात वल्लभनगर येथील संदेश पाडर या तरुणाचा मृत्यू झाल्याने श्री. हनुमान मंदिर कळसारोहण आयोजन समितीने सोहळ्याच्या नियोजनामध्ये बदल केला. त्यानुसार कळसाची शोभायात्रा रद्द करण्यात आली. तसेच सोमवारी आयोजित महाप्रसादाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed