देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघांपैकी एक असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ सर करण्याची योजना भाजपनं आखली आहे. या मतदारसंघातील वरळी आणि शिवडी मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहेत. अरविंद सावंत लोकसभेत दक्षिण मुंबईचं प्रतिनिधीत्व करतात. शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतरही ते ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी तेच रिंगणात असतील.
शिवसेना-भाजप युतीत दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर एकनाथ शिंदेंची शिवसेना दावा करू शकते. पण त्यांच्याकडे या मतदारसंघात उमेदवार नाही. माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंसोबत आहेत. पण त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ भाजपकडे जाईल अशी चर्चा आहे. भाजपकडून या मतदारसंघात मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नावं चर्चेत आहेत.
दुसरीकडे भाजपनं दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी आखणी केली. पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. मनसे आणि भाजपची जवळीक वाढली आहे. काही दिवसांपू्र्वीच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मनसेबद्दल सूचक विधान केलं. येत्या काळात मनसे कुठे असेल ते वेळच सांगेल असं म्हणत राज ठाकरेंशी आपली मैत्री असल्याचं फडणवीस म्हणाले.
गुजरातमध्ये जाणारे उद्योग, महाराष्ट्र अस्मिता, मराठी माणूस असे मुद्दे ठाकरेंकडे वारंवार उपस्थित केले जात आहेत. ते परतवून लावायचे असल्यास भाजपला मनसेची साथ लागेल. राज ठाकरे महाराष्ट्र अस्मितेचा मुद्दा अनेकदा उपस्थित करतात. मराठी मतांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील माझगाव, शिवडी, लालबाग, परळ या भागात राज यांची साथ भाजपसाठी गेमचेंजर ठरु शकते.