मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समन्वयकांची तातडीची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तासभर बैठक होऊनही मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघाला नाही.
जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी नकार दिला, मराठा समन्वयकांचा आरोप
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मराठा समाजाचे समन्वयक ऍड. बाबा इंदुलकर यांनी मागील ४० वर्षांच्या सरकारची री याही शासनाने ओढली. ओबीसी कोट्यामधून देण्यात येणारं ५० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही, मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत मात्र ते हतबल आहेत. त्यांच्या सरकारचा ड्रायव्हर वेगळा आहे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण शासनाच्या चुकीमुळे सुरू झालं आहे, जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलण्याची विनंती केली मात्र तीही मुख्यमंत्र्यांनी नाकारल्याचं इंदुलकर यांनी सांगितले.
आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत
कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयकांची सुमारे तासभर बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. मात्र यातून कोणताही तोडगा निघाला नाही. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना अनेक मराठा समन्वयकांनी एकमेकांविरोधात नाराजी व्यक्त केली, असा प्रकार शासकीय विश्रामगृह येथे दिसून आला. यावेळी योगेश केदार, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, प्रसाद पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.