आरोपी मॉरिस भाईचा अभिषेक यांच्यावर राग होता. २०२२ मध्ये मॉरिसवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्याला तुरुंगवास घडला. घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला जेलवारी घडली, असा त्याचा समज होता. त्यामुळे मॉरिसचा अभिषेक यांच्यावर राग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्यानं महत्त्वाच्या पक्षांकडून तिकिट मिळतंय का याची चाचपणी केली. पण बलात्काराचा आरोप असल्यानं कोणताही पक्ष त्याला तिकिट देण्यास तयार नव्हता. बलात्कारासह मॉरिसवर आणखी दोन केसेस होत्या.
क्राईम ब्रांचनं शनिवारी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला. मॉरिसच्या मनात अभिषेक यांच्याबद्दल टोकाचा राग होता. त्याला सूड घ्यायचा होता, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. झालं गेलं विसरुन जाऊ आणि सोबत काम करु, असा प्रस्ताव त्यानं अभिषेक यांना दिला. त्यावर अभिषेक यांनी विश्वास ठेवला.
मॉरिसनं अभिषेक यांना शुक्रवारी त्याच्या दहिसर पश्चिमेतील आयसी कॉलनीतील कार्यालयात बोलावलं. आपल्यातील मतभेद मिटल्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देऊ, असं मॉरिसनं अभिषेक यांना सुचवलं. त्यानंतर तो अभिषेक यांना घेऊन स्वत:च्या कार्यालयात घेऊन गेला. लाईव्ह सुरू असताना त्यानं अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. घोसाळकर यांच्यामुळे आपली राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपल्याचा राग मनात ठेवून मॉरिसनं टोकाचं पाऊल उचललं. अभिषेक यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच मॉरिसनं स्वत:वर गोळी झाडून घेतली.
मॉरिसनं अभिषेक यांना का संपवलं? तपासातून कारणांचा उलगडा; पोलिसांनी घटनाक्रम सांगितला
मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची शुक्रवारी (८ फेब्रुवारी) हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई असं त्याचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मॉरिसची पत्नी सरीनाचा जबाब काल नोंदवला. त्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.