मनसेकडून माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह गणेश सातपुते, बाबू वागस्कर आणि किशोर शिंदे हे नेते इच्छुक आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. नुकतेच पुण्यातील कोंढवा परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर जर दिल्लीला गेले तर दुधात साखर पडेल असं म्हणत साईनाथ बाबर यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. मात्र शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत असणारे वसंत मोरे दुखावले गेले आहेत. त्यांनी आपली खदखद ही समाज माध्यमांवर मांडली होती. ‘कोणासाठी कितीही केलं तरी शेवटी फणा काढतातच पण मी पक्का गारुडी आहे.’ असं म्हणत आपली खदखद व्यक्त केली होती.
तर, दुसरीकडे साईनाथ बाबर यांचा महापालिकेचा प्रभाग हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत असल्याने ते कदाचित शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील आणि शर्मिला वहिनी देखील त्याच बाबतीत बोलल्या असतील असं वसंत मोरे म्हणाले आहेत. पाच वर्ष महापालिकेत आम्ही दोघांनी एकत्र काम केलं आहे. आता साईनाथ बाबर हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून आणि मी पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार होऊन लोकसभेत देखील एकत्र काम करू, असं मोरे म्हणाले होते.
वसंत मोरे यांच्या या वक्तव्यानंतर पुणे लोकसभेतून इच्छुक असणारे साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. बाबर म्हणाले, वसंत मोरे यांचा प्रभाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आणि त्यांच्यावर राज साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देखील सोपवली आहे. त्यामुळे तात्या हे कदाचित बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार असतील पण मी मात्र पुणे लोकसभा मतदारसंघातूनच खासदार होणार आहे, याचा सर्वस्वी निर्णय हे शेवटी राज साहेबच घेतील, असं म्हणत साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे यांना डिवचलं आहे.