६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.०० वाजता दरम्यान पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील आरटीओ ऑफीस चौकातून कळंब चौक परिसरात आरोपी मनिष सागर शेंद्रे हा त्याच्या मैत्रीणीसोबत जात होता. यातील मृतक शादाब खान रफीक खान याला वाहनाचा कट लागला. त्यामुळे आरोपी व मृतक यांच्या मध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी घरी जाऊन देशी कट्टा घेऊन परत कळंब चौक येथे आला. त्याच्या पाठोपाठ त्याची मैत्रीणसुध्दा आली. यावेळीही आरोपीने तुम्ही मला व माझा मैत्रीणीला शिवीगाळ का केली असा मृतक यास जाब विचारला. तेव्हा मृतक व आरोपी यांच्यात वाद झाला. मनिष शेंद्रे याने त्याच्या जवळ असलेल्या देशी कट्ट्याने शादाब खान रफीक खान याचेवर गोळी झाडली. या गोळीबारात शादाब खान रफीक खान याच्या छातीत गोळी लागली.
यानंतर शादाब याला शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आले. मात्र, उपचार दरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे आधारसिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, शहरचे ठाणेदार सतिश चवरे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवुन दिली. शहरात अनुचित प्रकार घडु नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले होते. परिसरामध्ये शांतता असून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिक्स पॉईट व अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आले आहे. सदर घटनेसंबधाने कोणत्याही अफवार विश्वास ठेऊ नये असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी केले आहे.
