घटनेनंतर तिघा भावांपैकी सेवानिवृत्त जवान असलेल्या दत्तात्रय पाळदे यांच्या पत्नी सुनंदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती दत्तात्रय पाळदे यांच्यासोबत मातोश्री कॉलेजजवळील त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या गव्हाच्या पिकात पाच-सहा मेलेल्या कोंबड्या फेकलेल्या आणि त्यांना दहा-पंधरा कुत्री खात असल्याचे दिसून आले. शेजारीच दीर कैलास यांचे पोल्ट्रीफार्म असल्याने त्यांना याबाबत सुनंदा यांनी विचारणा केली असता कैलास पाळदे यांनी त्यांना शिवीगाळ केली.
यावेळी त्या ठिकाणी दुसरे दीर राजू पाळदे, सासू जनाबाई पाळदे, राहुल पाळदे, आकाश पाळदे, ललित पाळदे, प्रसाद पाळदे, शोभा पाळदे यांनी एकत्र येवून सुनंदा आणि त्यांचे पती दत्तात्रय यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. सुनंदा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, राणीहार आणि नेकलेस या मारहाणीत बळजबरीने ओढून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत दत्तात्रय पाळदे यांच्या कमरेला असलेले पिस्तूल हिसकावून सोबत घेवून गेले.
कैलास पाळदे यांनी देखील भाऊ दत्तात्रय व भावजय सुनंदा आणि पुतण्या कुणाल (रा. कोणार्कनगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली. आईच्या वाट्याची जमीन कैलास कसत असून, ही जमीन मिळावी यासाठी भाऊ दत्तात्रय नेहमी वाद करीत होता. शुक्रवारी (दि. २) डॉक्टरांनी शवविच्छेदन केलेल्या दोन-तीन कोंबड्या कैलास पाळदे यांनी स्वतःच्याच शेतात टाकलेल्या होत्या.
शुक्रवारी सायंकाळी शेतात पत्नी व मुलासह आलेला भाऊ दत्तात्रय या कोंबड्यांचा व्हिडीओ काढत असताना दिसून आल्याने त्याला कैलास यांनी याबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली. यावेळी त्याची पत्नी सुनंदा हिने ‘यांचा एकदाचा बंदोबस्त करा, एकेकाला गोळ्या घाला’ असे सांगताच भाऊ दत्तात्रय याने त्याच्या कमरेला असलेले पिस्तूल काढून कैलास पाळदे यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, कैलासचा मुलगा ललित याने चुलते दत्तात्रय यांना पाठीमागून प्रतिकार केल्याने गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने कैलास यांचा जीव वाचला. यावेळी सुनंदा पाळदे, कुणाल पाळदे यांनीही कैलास, राजू यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. या हाणामारीत गोळीबार झाल्याचे फिर्यादीत नमूद असल्याने नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे.