• Sun. Sep 22nd, 2024

नाशिकमध्ये वर्षभरात सापडले तब्बल ३५२ बेवारस मृतदेह; जिल्हा रुग्णालय चौकीत आकस्मित मृत्यूची नोंद

नाशिकमध्ये वर्षभरात सापडले तब्बल ३५२ बेवारस मृतदेह; जिल्हा रुग्णालय चौकीत आकस्मित मृत्यूची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सन २०२३ मध्ये वर्षभरात अज्ञातस्थळी, अपघातात व इतर कारणास्तव मृत्यू झालेल्या ३५२ नागरिकांचे बेवारस मृतदेह आढळून आले. त्यापैकी काही मृतदेहांची ओळख पटविण्यात आली असली, तरी उर्वरित मृतदेहांवर पोलिस व स्थानिक प्रशासनाने अंत्यसंस्कार केले आहेत. या सर्व प्रकरणांत दाखल अकस्मात मृत्यूंचा तपास करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहर आणि ग्रामीण भागात आढळलेल्या बेवारस मृतदेहांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे. सर्वाधिक मृतदेह पन्नासपेक्षा अधिक वयोगटातील आहेत. शवविच्छेदन अहवालानुसार बेवारस व्यक्तींपैकी अनेकांचा मृत्यू गंभीर आजारपण, वृद्धत्व आणि अपघाताने झाल्याची नोंद आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार पंचवटी, नाशिकरोड रेल्वे स्थानक, जिल्हा रुग्णालय परिसर, मनमाड रेल्वे स्थानक या परिसरात अनोळखी व्यक्तींचा वावर अधिक असून, तिथे त्यांचा मृत्यू झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाते. यापैकी अनेक जण फिरस्ते, भटके, भिक्षेकरी असतात. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर कायम आहे.

ठिकाण काळ मृत्यू

शहर – १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ २१६
ग्रामीण – १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ १३६
एकूण मृत्यू ३५२
‘पोषक’ अंड्यांसाठी भेदभावाचे ठिपके; विद्यार्थी माध्यान्ह भोजनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
ओळख कशी पटवतात?

– बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिस आकस्मिक मृत्यू दाखल करून तपास करतात
– बेपत्ता व्यक्तींच्या संपर्कातील नातलगांशी संपर्क साधला जातो
– मृत व्यक्तीच्या फोटोसह कागदपत्रांद्वारे माहिती मिळवून ओळख पटविण्यात येते
– ओळख न पटलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड व इतर कागदपत्रांनुसार ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो
– मात्र, त्यानंतरही ओळख न पटल्यास अखेर बेवारसची नोंद करून अंत्यसंस्कार करण्यात येतात
– नियमानुसार, सात दिवसांत बेवारस व्यक्तींवर प्रशासनातर्फे अंत्यसंस्कार करणे अपेक्षित असते
– परंतु, घातपात, मृत्यूचे कारण यासंदर्भातील तपास पूर्ण केल्यानंतरच हा निर्णय घेतला जातो

…असा होतो तपास

जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद होते. मृतदेह सापडलेले ठिकाण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्यांना कळविण्यात येते. तेथील पोलिस मरणोत्तर पंचनामा करतात. त्यानंतर बेपत्ता व्यक्ती अथवा इतर माध्यमातून ओळख पटविण्याचे काम होते. यासह पोलिस ठाण्यातील अंमलदारांकडे आकस्मिक मृत्यूचा तपास दिला जातो. शवविच्छेदन अहवाल, मृतदेहाची माहिती, घटना, घटनास्थळ, आढळलेले कागदपत्र अथवा इतर माहितीद्वारे प्राथमिक तपास केला जातो. तपासाअंती ओळख पटली अथवा नाही, यासंदर्भातील अहवाल सादर करून पुढील कार्यवाही केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed