• Fri. Mar 20th, 2026

    संजय राऊतांनी वात पेटवली, ‘रामकथा’ रंगताच सभागृहातील शिवसैनिकांच्या अंगात जोश संचारला

    संजय राऊतांनी वात पेटवली, ‘रामकथा’ रंगताच सभागृहातील शिवसैनिकांच्या अंगात जोश संचारला

    नाशिक: प्रभू श्रीरामाने त्याच्या आयुष्यात अनेकदा अपमान आणि अन्याय सहन केला पण त्याने कायम संयम राखला. रामाच्या अंगात युद्ध लढण्याची धमक होती, पण त्याचवेळी तो तितकाच संयमीही होता. त्यामुळे राम हा कायम शांत राहिला आणि त्याने योग्य संधी येईपर्यंत प्रतीक्षा केली. उद्धव ठाकरे हेदेखील रामाप्रमाणे संयमी आहेत. तेदेखील योग्य संधीची वाट पाहत आहेत. राम हा अयोध्येत होता तोपर्यंत युवराज होता, राम होता. पण तो जेव्हा जंगलातून संघर्ष करुन परतला तेव्हा तो भगवान राम झाला होता, मर्यादापुरुषोत्तम राम झाला होता. यामधून आपण एक गोष्टी शिकली पाहिजे की, संघर्ष केल्यानंतरच देवत्व प्राप्त होते. उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षालाही ही बाब लागू पडते, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. ते मंगळवारी ठाकरे गटाच्या नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात बोलत होते.

    यावेळी संजय राऊत यांनी आक्रमक शैलीत सादर केलेल्या ‘रामकथे’मुळे सभागृहातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. संजय राऊत यांनी रामकथेतील प्रसंग आणि पात्रांची वर्तमानाशी चपखलपणे सांगड घालत उत्तमप्रकारे राजकीय मांडणी केली. श्रीरामाला त्याच्या आयुष्यात कमी अपमान सहन करावा लागला का? राजवाड्यात, वनवासात वेळोवेळी रामाला अपमानाचे प्रसंग सहन करावे लागले. पण राम अपमान करणाऱ्यांकडे केवळ एक कटाक्ष टाकायचा. वेट अँड वॉच, माझीही वेळ येईल, हे त्याला माहिती होते. तशीच आपलीही वेळ येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    उद्धवसाहेब वेट अँड वॉच आपली पण वेळ येईल,संजय राऊतांकडून शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनाची दमदार सुरुवात

    रामाने धनिकांची मदत घेतली नाही, तर सामान्य लोकांना बरोबर घेऊन विजय मिळवला: संजय राऊत

    प्रभू श्रीरामावर जेव्हा वनवासात जाण्याची वेळ आली त्याकाळी त्याचं घराण भूतलावरील सर्वात मोठं खानदान होतं. तरीही त्याच्या नशीबी वनवास आला. राम वनवासाच्या दिशेने प्रवासाला निघाला तेव्हा वाटेत अनेक राज्यं होती. मात्र, रामाने कोणताही राजा, वतनदार, सरंजामदार यापैकी कोणाचीही मदत घेतली नाही. राम आपल्यासोबत सामान्य माणूस, वंचित, वानरं, माकडं, आदिवासी, ओबीसी, क्षत्रिय अशा सर्वांना घेऊन पुढे गेला. अन्यायाविरुद्ध लढण्याचा रामाचा निर्धार पक्का होता. रामाने धनिकांच्या मदतीने नव्हे तर सामान्य लोक आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढाई लढली, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    हनुमानाने जसा रावणाचा कॉन्फिडन्स लूज केला, तसाच आपल्याला भाजपचा कॉन्फिडन्स लूज करायचा आहे: संजय राऊत

    संजय राऊत यांनी आपल्या भाषणात सर्व शिवसैनिक म्हणजे हनुमान असल्याचे सांगितले. हनुमानाने रामायणात जशी महत्त्वाची भूमिका पार पाडली, तशीच भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. तसेच भाजप हा पक्ष अजिंक्य नाही, हेदेखील राऊतांनी ठणकावून सांगितले. रावण हा अजिंक्य नव्हता, त्याला बालीने हरवले होते. बालीने रावणाला बगलेत पकडून त्याची धिंड काढली होती. त्यामुळे रावण अजिंक्य होता, हे डोक्यातून काढून टाका. सध्याचा ‘रावण’ही अजिंक्य नाही. हनुमान लंकेत गेला तेव्हा रावणाच्या सैनिकांनी त्याला अटक केली. हनुमानाला दरबारात आणण्यात आले तेव्हा, रावणाने त्याला विचारले, ‘काय रे वानरा, मला ओळखत नाहीस?’ तेव्हा हनुमान म्हणाला की, ‘हो मी तुला ओळखतो, तू तोच ना ज्याची बालीने बगलेत पकडून धिंड काढली’. हनुमानाचं हे वाक्य ऐकून रावणाचा चेहरा पडला. हनुमानाने भर दरबारात रावणाला हे सांगितलं कारण, त्याल रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता. लढाईत पहिले शत्रूचा आत्मविश्वास डळमळीत केला पाहिजे. अरे कोण भाजप, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ मिंदे?, असे संजय राऊत यांनी म्हटले. राऊतांनी हे वाक्य उच्चारताच सभागृहातील शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

    हनुमानाने पहिल्याच भेटीत रावणाचा आत्मविश्वास तोडला, त्यामुळे तो रामाकडून पराभूत झाला. इथे बसलेले आपण सगळे शिवसैनिक म्हणजे हनुमान आहोत. राम हा उत्तम नेता होता. त्याने सुग्रीवासारख्या सामान्य वानराला नेता केले. रामाने हनुमानाला लंकेत जाऊन सीतेची ख्यालीखुशाली विचारायला सांगितली होती आणी मी येतोय, असा संदेश पाठवला होता. पण त्यापुढच्या सगळ्या घडामोडी हनुमानाने स्वत:च्या हिंमतीवर केल्या. राम आणि हनुमानामध्ये लंकेला जाण्यापूर्वी फक्त थोडासाच संवाद झाला होता. हनुमान दिलेली कामगिरी पार पाडेल, यावर रामाचा विश्वास होता. रामाप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपले कार्यकर्ते इकडची दुनिया तिकडे करु शकतात, हा विश्वास ठेवा. मग लंकेला आग लावायला किती वेळ लागतो? उद्धवजी, लंका जाळण्यासाठी आम्हाला तुमच्या आदेशाचीही गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed