• Wed. Jun 10th, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऊरळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन

    ByMH LIVE NEWS

    Jan 20, 2024
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऊरळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन

    पुणे, दि. २० : पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी, असे प्रतिपादन उपमख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    ऊरळी कांचन येथील पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, राहुल कुल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपायुक्त आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, सरपंच भाऊसाहेब कांचन आदी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पोलीस स्टेशनसाठी १०० पदांची मंजुरी देण्यात आली आहे. गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांनी कठोरपणे कारवाई करावी. पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून निधी देण्यात येत आहे. या निधीतून पोलिसांसाठी वाहने, अत्याधुनिक यंत्रणा, गृहप्रकल्प इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत.

    पोलिसांनी त्यांच्या तंदुरुस्तीसाठी लक्ष द्यावे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांचे उदात्तीकरण होता कामा नये. गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला पाहिजे. पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होणारे कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली काम न करता गुन्हेगारी मोडून काढावी. सध्या पोलिसांच्या संकल्पनेत बदल झाला आहे. स्मार्ट पोलिसिंग च्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यात चांगले नाते निर्माण होत आहे  असे श्री. पवार म्हणाले.

    पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, गुन्हेगारी तपासाचा वेग वाढवावा, अभिलेख वर्गीकरण अद्यायावत ठेवावे. वाहतुकीचे योग्य नियमन करावे, कर्मचाऱ्यांना अद्ययावत  प्रशिक्षण द्यावे. सर्वच बाजूंनी पोलीस दलाची क्षमता वाढवा. नवीन पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावला जाईल. पोलीस विभागाला सर्व  सुविधांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    ऊरळी कांचन गावाची लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली आहे. स्थानिक नागरिकांची  येथे नगरपरिषद व्हावी अशी मागणी होत असून यावर निश्चितच मार्ग काढला जाईल. पुणे-सोलापूर महामार्ग गावातून जात असल्याने वाहतूककोंडी  होत असते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. गावाच्या विकासाच्यादृष्टीने अनेक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

    आमदार श्री. पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून याठिकाणी पोलीस स्टेशन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. उरुळी कांचन गावाची लोकसंख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. लोणी काळभोर परिसरात अपर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. उरुळी कांचन नगरपरिषद व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. परंतु जागेअभावी तो प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

    प्रास्ताविकात श्री. गोयल म्हणाले, या ठिकाणी लोणी काळभोर स्टेशनची खूप जुनी पोलीस चौकी होती. पोलीस स्टेशन मंजुरी मिळून दोन वर्ष झाली. मनुष्यबळाला अभावी पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले नव्हते. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस विभाग बळकटीकरणासाठी बरीच मदत मिळाली. त्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या पोलीस स्टेशन अंतर्गत १० गावांचा समावेश आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच गुन्हे नियंत्रण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed