• Fri. Mar 13th, 2026
    मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी, १३०० जण पडले आजारी, कशाने झाला त्रास?

    अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटन कार्यक्रम दौरा नुकताच पार पडला. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन दृष्टीने उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये मळमळ, ॲसिडीटी, डोकेदुखीसारखे त्रास झालेल्या १३०० जणांना गोळ्या-औषधे देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी ही माहिती दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुमारे दीड लाख नागरिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काही जण आजारी पडणे अपेक्षित असते. काही जण पुरेसे पाणी जवळ ठेवत नाहीत, तसेच हवेतील बदल, दीर्घकाळ उन्हात राहणे यामुळे डोकेदुखी, मळमळणे, डिहायड्रेशनसारख्या सामान्य आजारांचा त्रास होऊ शकतो. जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता वैद्यकीय आरोग्य विभाग उभारला होता. यामध्ये या आजारांच्या तक्रारी घेऊन आलेल्यांना ओआरएस पाणी, ग्लुकोज आणि अॅसिडीटीवर गोळ्या-औषधे, तसेच हलके अन्न देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे डॉ. देवमाने यांनी सांगितले.

    मोठ्या आणि खुल्या कार्यक्रमामध्ये एक-दोन टक्के लोकांना असा त्रास होतो, असे जिल्हा चिकित्सकांनी सांगितले. तर दोन व्यक्तींना एक दिवसासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी ठेवण्यात आली होती. यामध्ये ७० रुग्णवाहिका, तसेच अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली होती व सर्व वैद्यकीय अधिकारी हे कर्तव्यावर हजर होते, असेही ते म्हणाले.
    अवहेलना होणार ‘ठेंगणी’; कमी उंचीच्या मुलांवर ‘जेजे’मध्ये महात्मा फुले योजनेंतर्गत उपचार

    म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed