• Fri. Mar 20th, 2026
    तू घे भरारी… – महासंवाद

    नवी मुंबई दि.१२ :- नवी मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळावर अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू या प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला ग्रामीण महिलांची प्रचंड गर्दी होती. महिलांचा उत्साह दिसून येत होता.  महिलांच्या आसन व्यवस्थेकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले होते.

    उपस्थित महिला हौशेने एकाच रंगाच्या साड्या‌ परिधान करुन आल्या होत्या. त्यांची दूर्दम्य इच्छाशक्ती व आशावाद हे विकसित महाराष्ट्राचे प्रतिबिंब होते. शासनाच्या योजना या केवळ कागदावरच न राहता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे, याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने दिसले.

    भडगाव, ता.वैजापूर जि.संभाजीनगर येथून आलेल्या वैशाली दिपक जगताप म्हणाल्या की, आम्ही जरी ग्रामीण भागात राहत असलो म्हणून काय झालं , “आम्हालाबी आमच्या संसारात हातभार लावायचा हाय” ग्रामीण भागात महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  या अडचणी ओळखून सरकार आमच्या पाठीशी खंबीर उभं हाय, म्हणूनच आम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. त्यातून आम्ही बचतगट स्थापन केलाय. या बचत गटाच्या माध्यमातून गावातच वॉटर फिल्टर, दूध संकलन केंद्र चालू केले आहे. त्याचबरोबर कॉमन सर्विस सेंटर चालू करुन सगळया सुविधा या सेंटरमधून पुरवतो.  त्यामुळे गावकऱ्यांना यांत्रिक साधने दुरुस्त करण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. मायबाप सरकार खऱ्या अर्थाने आमचा आधार बनला आहे.

    रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातून आलेल्या श्रीमती अर्चना चंद्रकांत वालम यांना दोन जुळ‌्या‌ मुली असून शासनाच्या सुकन्या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तर उमेद अभियानांतर्गत बँक कर्ज मिळाल्याचे नागमठाण ता.वैजपूर येथील विजया चांगदेव घोडके यांनी सांगितले. स्टार्टअप योजनेंतर्गत खेळतं भांडवल मिळालं, त्यातून त्यांनी कापड व्यवसाय सुरु करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी १५ गावे मिळून एक ग्रामसंघ स्थापन केला आहे. तर प्रभात संघ अंतर्गत शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. मशीनद्वारे स्वच्छ करुन विविध डाळी, धान्य, कडधान्य ग्राहकांना माफक दरात उपलब्ध करुन देतात. स्वत:सोबत इतर महिलांना आर्थिक लाभ मिळवून देत आहेत.

    गणेशकृपा या बचतगटाच्या माध्यमातून रायगड जिल्ह‌्यातील उरण तालुक्यातून  आलेल्या श्रीमती शोभा धनाजी म्हात्रे यांनी पापड लघुउद्योग सुरु करुन २५ ते ३० महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. याकरिता त्यांच्या बचतगटाला १५ हजाराचे कर्ज शासनाकडून उपलब्ध झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. १ टक्का व्याजदराने एक लाखाचे कर्ज देखील उपलब्ध झाले आहे. यातून एक बचतगट स्थापन करुन त्यांनी लोणचे, मसाला, चहा पावडर विविध प्रकारचे लाडू तयार करुन त्या आत्मविश्वासाने स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

    पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून आलेल्या वर्षा केतकावळे आणि सायली अक्षर पांघारे यांना देखील शासनाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊन कुक्कुटपालन व्यवसायात त्या आत्मविश्वासाने उतरल्या आहेत. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचा लाभ घेतल्याची प्रातिनिधीक उदाहरणेही सांगता येतील.

    0000000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed