• Thu. Mar 19th, 2026

    विरोधकांच्या शेलक्या टीकेकडे दुर्लक्ष, पक्षाची बाजू मांडण्यात निष्क्रियता, काँग्रेस कार्यकर्ते संतापले

    विरोधकांच्या शेलक्या टीकेकडे दुर्लक्ष, पक्षाची बाजू मांडण्यात निष्क्रियता, काँग्रेस कार्यकर्ते संतापले

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: समाजमाध्यमांवर नेत्यांवर होणारी शेलक्या भाषेतली टिका-टिप्पणी आणि पक्षाची बाजू मांडण्यात असणारी कमालीची निष्क्रियता याविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद अखेर ‘एक्स’च्या माध्यमातून मंगळवारी बाहेर पडली. राज्यात पक्षाला पोषक वातावरण असूनही नेत्यांच्या माध्यमांतून कार्यकर्त्यांना काहीच कार्यक्रम दिला जात नाही. तसेच सत्ताधारी पक्षाशी थेट लढाई लढण्यासाठीही नेते कचरत असल्याचीही खंत कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या असंतोषाची दखल घेत ‘एक्स’वर कार्यकर्त्यांना समाजमाध्यमावर काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडली जाईल, अशी ग्वाही दिली.

    महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते एकदम चिडीचूप झाल्याची स्थिती आहे. मुंबई काँग्रेसही फारशी आक्रामक नसल्याचेच चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी २८ डिसेंबरला नागपूरमध्ये काँग्रेस स्थापना दिनाच्या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे या सभेची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र मंगळवारी समाजमाध्यमांत काँग्रेसच्या समाजमाध्यम आणि प्रत्यक्ष जमिनीवरील अस्तित्त्वाबाबत कार्यकर्त्यांनी नेत्यांना उद्देशून प्रश्नांची सरबत्ती केली.

    आपली भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी नुकतीच सहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आणि नंतर तातडीने आमदारकी रद्द करण्यात आलेल्या काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या समर्थनार्थ कुठलेही आंदोलन किंवा प्रतिक्रिया राज्यातील प्रमुख नेत्यांनी न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी मंत्री असलेल्या नेत्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत केवळ प्रसिध्दीपत्रक आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेत्यांनी माध्यमांत भूमिका मांडल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली. समाजमाध्यमांवर धमकी आली तर पक्ष काय करणार, पाठबळ नसल्याने कार्यकर्ते स्वतःची मते मांडायलाही घाबरतात, अशीही भावना एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.

    देशात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूंचे रहस्य काय? कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू? वाचा सविस्तर

    शेकडो कार्यकर्त्यांनी याविषयावर आपली मते व्यक्त करत असताना काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी लवकरच भेटून याविषयावर चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र, यशोमती ठाकूर वगळता इतर कोणत्याही नेत्याने कार्यकर्त्यांच्या या उद्विग्नतेची साधी दखलही घेतली नाही.

    कोट

    समाजमाध्यमांवर काँग्रेस आणि लोकशाहीवादी विचार मांडणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या भावना वाचल्या. आपण सर्वांनी एकदिलाने काम सुरू ठेवूया. दररोज नवनवीन संकटे येत असतानाही आपण सर्वजण या देशातील लोकशाहीवर श्रध्दा ठेवून लढताय, याचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. या संघर्षात मी तुमच्या सोबत आहे.

    -यशोमती ठाकूर, आमदार

    काँग्रेस सत्तेत येणार, शेरोशायरीच्या अंदाजात कैलास गौरंट्याल यांनी विश्वास व्यक्त केला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed