नागपूर : राज्यात तसेच नागपुरात महिला तसेच अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात अल्पवयीन मुलींना प्रेमात फसवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटना वाढल्यात. याखेरीज पालकांनी साध्या सुध्या कारणांवरून रागावणे तसेच घरगुती वाद यांमुळेसुद्धा मुली घर सोडून पळून जात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
याबाबत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वेळेअभावी हा प्रश्न चर्चेला येऊ शकला नाही. मात्र, यावर फडणवीस यांनी लेखी उत्तर सादर केले.
याबाबत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वेळेअभावी हा प्रश्न चर्चेला येऊ शकला नाही. मात्र, यावर फडणवीस यांनी लेखी उत्तर सादर केले.
या माहितीनुसार, एकट्या नागपूर जिल्ह्यात आठ महिन्यांत एकूण ३८३८ जण बेपत्ता झाले. यात २०११ महिला व २२५ मुली आहेत. ३८३८मधील ३२३९ जण सापडले. घरगुती वादाखेरीज मुलींना प्रेमसंबंधांतून आमिष दाखविले जात आहे. यामुळेसुद्धा पळून जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
बेपत्ता मुलींना शोधण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. तसेच मानवी तस्करी रोकण्यासाठीसुद्धा विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, अशीही लेखी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली. यात ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी जनजागृतीसुद्धा केली जात आहे, अशीही माहिती देण्यात आली.