भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून, देशभरातून अनुयायी भीमा कोरेगाव येथे येत असतात. या ठिकाणी बार्टीच्या वतीने जेवणावळीवर निधीची उधळण करण्याचं काम करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे शासनाला आमचं सांगणं आहे, बार्टीला आमचं सांगणं आहे की कोणीही तिथे जेवण करण्यासाठी येत नसतं किंवा कोणाचीही जेवणावळी देण्याची मागणी नाहीये. बार्टीचा निधी हा विद्यार्थ्यांसाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी खर्च झाला पाहिजे तो इतर कुठल्याही कारणासाठी खर्च करण्यात येऊ नये, असं सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं.
त्याचवेळी बार्टीने काढलेली जाहिरात त्यांनी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही सिद्धार्थ मोकळे यांनी केलीये. बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अनेकदा फेलोशीपसाठी आंदोलन करण्यात येते. दोन-दोन, तीन-तीन महिने विद्यार्थी आंदोलनाला बसलेले असतात आणि बार्टीचे अधिकारी किंवा शासनाकडून सांगण्यात येतं की आमच्याकडे निधी नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेली संस्था ही विद्यार्थ्यांना निधी नाही असं सांगते मात्र दुसरीकडे जेवणावळीवर उधळण करते, अशी टीका मोकळे यांनी केली.
यामागचं जे काही ठेकेदारांचे इंटरेस्ट जपण्याचं किंवा तोड पाणी करण्याचं राजकारण सुरू आहे ते तातडीने थांबविण्यात यावे. बार्टीचा प्रत्येक एक एक रुपया प्रशिक्षण आणि संशोधनासाठी, विद्यार्थ्यांसाठी, विद्यावेतनासाठीच खर्च केला जावा ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका असल्याचं मोकळे यांनी सांगितलं.