• Sat. Mar 14th, 2026

    मिठागरांवर धावणार रेल्वे टर्मिनस; MRVCकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु, असा आहे प्रकल्प…

    मिठागरांवर धावणार रेल्वे टर्मिनस; MRVCकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु, असा आहे प्रकल्प…

    मुंबई : रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कॉरिडोर आणि मुंबईबाहेरून मेल-एक्स्प्रेसची वर्दळ हाताळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरातील मिठागरांच्या जमिनीचा वापर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रस्तावित ३० सायडिंग मार्गिकांसाठी नायगाव-वसई परिसरात १६ हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प ३ अ अंतर्गत बोरिवली ते विरार पाचव्या-सहाव्या मार्गिका प्रकल्पासाठी मिठागरांच्या जमिनीचा वापर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. बोरिवली-विरारदरम्यान दोन नव्या मार्गिकांसाठी मिरारोड स्थानक परिसरातील ११ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. भूसंपादन अंतिम टप्प्यात आल्यावर खासगी व्यक्तीने त्या जागेवर दावा केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याचा परिणाम प्रकल्पावर होऊ नये यासाठी नायगाव-वसई परिसरातील पर्यायी जागा निवडण्यात आली आहे.

    नायगाव-वसई पश्चिमेतील एकूण १६ हेक्टर जमिनीमध्ये मिठागरांची साडेतीन हेक्टर, खासगी तीन हेक्टर आणि सरकारी दहा हेक्टर जमिनीचा समावेश आहे. भूसंपादनासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे ‘एमआरव्हीसी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितले.

    बोरिवली-विरारदरम्यान २६ किमी लांबीच्या दोन मार्गिकांसाठी २,१८४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक खारफुटी हटवण्यासह सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. प्रकल्पात सायडिंग मार्गिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. १६ हेक्टर जागेची संयुक्त तपासणी सुरू आहे. तपासणी पूर्ण झाल्यावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारी ताब्यातील जमीन मोठ्या प्रमाणात असल्याने भूसंपादनाला कोणताही अडथळा येणार नाही. संपादन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
    मालगाड्यांच्या घसरगुंडीचा मनस्ताप; मध्य रेल्वेकडून अपघाताची कारण शोधण्यासाठी चौकशी सुरु
    पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसमधून रेल्वेगाड्या सुटतात. सध्या टर्मिनसची क्षमता पूर्ण झाली आहे. भविष्यातील प्रवासी गरज लक्षात घेता नवीन रेल्वे टर्मिनस उभारणीसाठी जागेचा शोध सुरू आहे. एमआरव्हीसीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर याचा फायदा पश्चिम रेल्वेला होणार आहे, असे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

    एप्रिल २०१९मध्ये नवी मुंबई विमानतळाला रेल्वे जोड आणि विस्तारीत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी एमयूटीपी ३ अ प्रकल्प संच मंजूर करण्यात आला आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार ३३,६९० कोटींचा निधी खर्च करणार आहे.

    असा आहे प्रकल्प

    एमयूटीपी ३ अ – ३३,६९० कोटी
    बोरिवली ते विरार पाचवी-सहावी मार्गिका – २,१८४ कोटी
    दोन मार्गिकांची लांबी – २६ किमी
    दोन महत्त्वाच्या पुलांसह तीन मोठे पूल, १५ लहान पूल
    प्रकल्पात अडथळा असलेली खारफुटी हटवण्यास मंजुरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed